– अनिल विद्याधर
जपानमधील शास्त्रज्ञांना प्रथमच ढगात प्लॅस्टिकचे नमुने आढळले असून त्यांच्या म्हणण्यानुसार, समुद्राच्या माध्यमातून तिथवर पोहोचतात व तेथून ते वायुमंडळाच्या दिशेने आपला मार्ग शोधतात.
जपानमधील या पथकाने माउंट फुजी आणि माउंट आयोमाच्या 1300 ते 3776 मीटर उंचीवरील शिखरावरून पाणी एकत्रित केले आणि त्यावर संशोधन केले. या सर्व पाण्याच्या नमुन्यांचे कॉम्प्युटर इमेजिंग तंत्राच्या मदतीने विश्लेषण केले गेले. शास्त्रज्ञांना यात असे आढळून आले की, ढगातून एकत्रित केल्या गेलेल्या प्रत्येक लिटर पाण्यात प्लॅस्टिकचे 6.7 ते 13.9 तुकडे होते. त्याची उंची 7.1 मायक्रोमीटर ते 94.6 मायक्रोमीटरपर्यंत होती. त्याचा व्यास माणसाच्या एका केसाच्या आकाराइतका असतो.
एन्व्हायर्न्मेंटल केमिस्ट्री लेटर्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार पाण्याच्या या थेंबांमध्ये हायड्रोफिलिक पॉलिमरची सर्वाधिक मात्रा आढळून आली. हायड्रोफिलिक पॉलिमरची अधिक मात्रा पाण्यात किंवा द्रव्य रूपात अवशोषित करून अधिक फुलते. ती पाण्यात पकडून राहणारी असते. मात्र, सूर्यापासून येणारी किरणे या विषारी पॉलिमरचे बंध तोडून टाकतात. यात कार्बन डायऑक्साइड आणि नायट्रोजनसारख्या ग्रीन हाउस गॅसचे प्रमाण वाढते. त्यामुळे ढगात त्याचे प्रमाण अधिक असणे धोकादायक मानले जाते.
वासेदा विद्यापीठातील मुख्य लेखक हिरोशी ओकोची यांनी प्लॅस्टिकचे कण आपल्या वायुमंडळातील प्रदूषणामुळे आल्याचे निरीक्षण नोंदवले. ही समस्या निकालात काढली नाही तर पावसाचे चक्र बिघडू शकते. भविष्यात यामुळे कोरडा दुष्काळही पडू शकतो. शास्त्रज्ञांच्या मतानुसार, मायक्रोप्लॅस्टिक असे कण आहेत, जे 5 मिलिमीटरपेक्षा कमी आकाराचे आणि अतिशय धोकादायक असतात. हेच पाणी पिण्याच्या आणि स्वयंपाकातील पाण्यातून शरीरात जाऊ शकते आणि गर्भवती महिलेच्या अर्भकापर्यंतही पोहोचू शकतात… यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते, असे निरीक्षण यात नोंदवले गेले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेलाही प्लॅस्टिकच्या समस्येची चिंता लागलेली आहे. कारण प्लॅस्टिक अनेक वर्षे सडत नाही, कुजतही नाही. प्लॅस्टिकचा हा कचरा शेवटी समुद्राच्या पोटात जाऊन समुद्राची हानीच करतो आहे. प्लॅस्टिक कचऱ्याची गल्लीतील समस्या आता थेट समुद्राच्या पोटात साठणाऱ्या प्लॅस्टिकपर्यंत जाऊन पोहोचली आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर प्लॅस्टिकच्या धोक्याबाबत सांगताना म्हणतात की, प्लॅस्टिकचा सर्व प्रकारचा वापर रोखणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. याचे कारण आज प्लॅस्टिकचा वापर असंख्य वस्तूंमध्ये होत आहे.
पेनामधील रिफिलचे उदाहरण घेतले तर पूर्वी आठ आण्याला सुटी रिफिल मिळत होती. आता ती प्लॅस्टिकच्या वेस्टनात मिळते. त्यामुळे तिचा आकर्षकपणा वाढला, किंमत वाढली पण पर्यावरणाचे नुकसानही वाढले. कारण, रिफिल काढून घेऊन ते प्लॅस्टिक आवरण टाकून दिले जाते. अशा खूप साध्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत; परंतु त्यामध्ये पर्यावरणाचा विचार होताना दिसत नाही. प्लॅस्टिकचा सर्वाधिक वापर होतो कॅरीबॅगच्या स्वरूपात. खरे पाहिल्यास पूर्वीच्या काळी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर केला जात नव्हता. त्या काळात कापडी, कागदी पिशव्या लोक वापरत होते; परंतु कालांतराने प्लॅस्टिकच्या पिशव्यांची उपलब्धता वाढली आणि हा एक सोपा पर्याय आहे हे दिसल्यानंतर त्याच्या वापरापेक्षाही जास्त गैरवापर वाढला. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा फार मोठा धोका पर्यावरणाला आहे.
आपण एक कागदी पिशवी वापरली तर हा कागद नैसर्गिक पद्धतीने नष्ट होण्यासाठी फक्त पाच आठवडे लागतात. त्याची कुजण्याची प्रक्रिया तत्काळ होते आणि त्यामुळे पर्यावरणाला त्यापासून हानी होत नाही. कापडी पिशव्यांचे कापड नष्ट होण्यासाठी पाच महिने लागतात. ते कापड जमिनीखाली गाडून ठेवले तर पाच महिन्यांनी ते पूर्णपणे कुजते. त्यामुळे पर्यावरणाला त्यापासून नुकसान होत नाही. प्लॅस्टिक पिशव्यांचे मात्र तसे नाही. सध्या ज्यापासून प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग बनवल्या जातात, ते प्लॅस्टिक नैसर्गिकपणे नष्ट होण्यासाठी निसर्गाला 500 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागतो. त्यामुळे ते नैसर्गिकपणे नष्टच होत नाही. साहजिकच ते पर्यावरणासाठी हानिकारक असते.
आज मुंबईसारख्या ठिकाणी किंवा समुद्रकिनारी असणाऱ्या गावांमध्ये-शहरांमध्ये समुद्राच्या पाण्याचा तळ प्लॅस्टिकने झाकलेला आहे, इतका प्लॅस्टिकचा वापर वाढलेला आहे. ही एका भीषण धोक्याला जन्म घालणारी गोष्ट आहे. याचा जीवसृष्टीवर-जलसृष्टीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. समुद्राच्या, नद्यांमध्ये राहणारे जलचर पाण्यात टाकलेले प्लॅस्टिक खाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे मृत प्राणी कापल्यानंतर त्यांच्या पोटात प्लॅस्टिक आढळल्याचे दिसून आले आहे.
आपल्याकडे नदीत किंवा समुद्रात निर्माल्य टाकताना तेही प्लॅस्टिकच्या पिशवीसकट टाकले जाते. घरातील कचराही प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधून कचराकुंडीत टाकला जातो. हा कचरा जी जनावरे खातात, त्यांच्या पोटात प्लॅस्टिक जाते. कोल्हापुरात अशा मोकळ्या गाई किंवा म्हशींच्या पोटातून तीस-चाळीस किलो प्लॅस्टिकचे कागद काढण्यात आले आहेत. म्हणजे आपल्या गैरवापरामुळे दुसऱ्याचा जीव जातो आहे याचा विचार माणसाने केला पाहिजे.