दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा ; भातखाचरे मजुरांनी गजबजली
राजगुरुनगर – खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भात लावणीला सुरुवात झाली आहे. तब्बल महिनाभर पावसाने ओढ दिल्याने भात लावणी रखडली होती. मात्र, चार ते पाच दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस पडत असल्याने भात लावणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भात रोपांची पेरणी झाली होती. धूळ वाफेवर पेरणी केलेली भात रोपे आता लावणीयोग्य झाली आहेत. मागील पाच दिवसांपासून भीमाशंकर परिसरात पाऊस पडत असल्याने भातखाचरे भरली आहेत. मात्र, पश्चिम भाग वगळता तालुक्याच्या इतर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. तालुक्यात भात आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठे आहे. सध्या पडत असलेला पाऊस भात व सोयाबीन पिकासह इतर खरीप हंगामातील पिकांसाठी योग्य आहे. दुबार पेरणीचे संकट टळले आहे.
खेड तालुक्यात बासमती, इंद्रायणी, तांबडा रायभोग, कमावत्या, जीरा, कोळंबा, खडक्या जिरा भाताची लागवड होते. भात पिकासह डोंगर शेतीमध्ये नाचणी, वरई, सावा ही पिके घेतली जात आहेत. पश्चिम भागातील अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीने भाताची लावणी करीत आहेत. यात चारसूत्री पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
शेतात गाळ करण्यासाठी ट्रॅक्टरसारख्या साधनाचा वापर केला जात आहे. भोरगिरी, कुडे, घोटवडी, मंदोशी, भोमाळे, खरपुड, टोकावडे, शिरगाव, मोरोशी परिसरात भात लावणी (आवणी) ला वेग आला आहे. या गावांच्या खाली असलेल्या डेहणे, शेंदुर्ली, कळमोडी, औदर, आव्हाट, गोरेगाव, सुरकुंडी पाईट आंबोली, गडद या गावांच्या परिसरात कमी पाऊस असल्याने भात खाचरे पूर्ण क्षमतेने भरली नसल्याने भात लावणी रखडली आहे तर पांथळीच्या खाचारांमध्ये भात लावणी सुरू आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मजुरीचा भाव आवाक्याबाहेर
एकाचवेळी सर्वत्र भात लावणी येत असल्याने भात लावणीसाठी मजूर टंचाई भासत आहे. तीनशे-चारशे रुपये रोज, चांगले जेवण असा मजुरीचा भाव असल्याने शेतकऱ्यांना मजुरी परवडत नाही. उत्पादन खर्च मिळत नसल्याने शेतकऱ्यांची भात शेती अडचणीत आली आहे. पावसाची अनियमितता असल्याने दिवसेंदिवस भात शेतीमध्ये घट होत आहे. नैसर्गिक संकट येत असल्याने भात उत्पादकांना फटका बसत आहे. कधी कोरडा दुष्काळ कधी ओला दुष्काळ पडत असल्याने उत्पादक शेतकरी दरवर्षी अडचणीत आहेत.