रुईतील बाबिर यात्रा उत्सवामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवीत
योगेश कणसे
लोणी देवकर – खास यात्रेतील हक्काची बाजारपेठ ग्रामीण भागातील व्यावसायिकांना यंदा यात्रा सुरू झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. ग्रामीण भागात घरबसल्या चालणारे अनेक व्यवसाय यात्रेतील बाजारपेठेत वर्षभराला पुरेल एवढी कमाई करुन देणारे ठरतात. यात विशेषतः घोंगडी, कोपरी, शेतात दररोजच्या वापरातील हत्यारे, घरगुती लाकडी व दगडी साहित्य बनविणारे कारागिरांसह मिठाई व्यावसायिकांचा समावेश असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून गावोगावच्या यात्रा बंद असल्याने या व्यावसायिकांसाठी सध्याचा काळ अडचणीचा ठरला होता.
इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवाची यात्रा मोठ्या स्वरुपात भरते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांची संख्या विचारात घेता येथील यात्रा बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. बाबीर यात्रेत मोठ्या संख्येने येणाऱ्या मेंढपाळ वर्गाकडून मागणी होत असलेल्या घोंगडी व कोपरी विक्रीची येथे स्वतंत्र पेठ असते. कोरोना काळाच्या पूर्वी या घोंगडी विक्रीच्या पेठेत तीन दिवसांत लाखोंची उलाढाल होत होती. सध्या मात्र घोंगडी उत्पादक गारठलेल्या अवस्थेत आहेत.
रुई येथील बाळासाहेब भगत म्हणाले, येथील बाबीरदेवाच्या यात्रेबरोबर भादे (लोणंद) व सालप येथील बिरोबा, वीर येथील म्हस्कोबा, धुळदेव, देवदैठण येथील खंडोबा, पंढरपूर, आळंदी येथील यात्रांमध्ये घोंगड्यांना मोठी मागणी असते.गावात सुमारे 20 कुटुंबातील 50 लोक हातमागावर घोंगडी उत्पादन करण्याचे काम करत होते. सध्या मात्र मोहन भगत यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती हे काम करत आहेत. त्यांनीही आता घोंगडी निर्मितीला बगल देत वुलनपासून शाल विणण्याचे काम सुरू केले आहे.
यंदाही यात्रा सुरू झाल्याने कोपरीची मागणी वाढली आहे. गावोगावच्या आठवडे बाजारात कोपरी हातोहात विक्री होत होती. मात्र बाजारही बंद असल्याने आमचा व्यवसाय सध्या अडचणीत आहे. गावात दहा कारागिर कोपरी तयार करत होते. मात्र त्यांच्यावर सध्या शेतमजूरी करण्याची वेळ आली आहे. सध्या काही होलसेल दुकानदारांकडून कोपरीस मागणी आहे. मात्र करोनापूर्वी असलेली मागणी व सध्याच्या मागणीत खूप मोठी तफावत आहे. यात्रा बाजार सुरू झाल्यास आमच्या व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होईल.
-बाळू मारकड, कोपरी उत्पादक