मराठा क्रांती मोर्चाचा इशारा : राजगुरूनगरमध्ये कॅन्डल मार्च
राजगुरूनगर – निर्दयी सरकार मुदत घेऊनही मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा निर्णय घेत नसेल, तर चाकण मराठा आंदोलनाची पुनरावृत्ती करण्यास भाग पाडू नका. दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण दिले नाही तर आगामी काळात मराठ्यांचा उद्रेक होईल, असा इशारा खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे यांनी सरकारला दिला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी राजगुरूनगर येथे 6 दिवसांपासून अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, विकास ठाकूर, अजय स्वामी यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे व राजगुरुनगर येथील मराठा क्रांती मोर्च्याच्या सदस्यांचे आमरण उपोषण यांना पाठिंबा देण्यासाठी आज (दि. 31) खेड तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने राजगुरूनगर शहरातून कॅन्डल मार्च काढला. या आंदोलनात तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला, युवक सहभागी झाले होते.
खेड तहसीलदार कार्यालयापासून या मार्चला सुरुवात झाली. वाडा रस्त्याने आमरण उपोषण स्थळी कॅन्डल मार्च काढण्यात आला त्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अंकुश काळे, शंकर राक्षे, कैलास मुसळे, कविता बोंबले, विवेक येवले, सुदाम कराळे, दिलीप होले, अड निलेश आंधळे, सुभाष माडेकर, कैलास दुधाळे, वामन बाजारे, संतोष टाकळकर आदीसह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.
उपोषणकर्ते अंकुश राक्षे म्हणाले, आंदोलन अंतिम टप्प्यात आले आहे. सरकार काहीतरी निर्णय घेईल असे वाटत असताना मुख्यमंत्री ही बाब टिंगलीवर नेत आहेत. आम्ही कुणबी आहोत मराठ्यांना कुणबीचे आरक्षण मिळाले पाहिजे. कोणत्याही समाजाच्या भावना आम्ही न दुखावता आमच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे
उपोषणकर्ते मनोहर वाडेकर, विकास ठाकूर यांच्यासह कविता बोंबले, निलेश आंधळे, कैलास मुसळे, सुदाम कराळे, सुभाष मांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. वामन बाजारे यांनी आभार मानले
अधिवेशन बोलावून आवाज उठवावा
मराठा आरक्षण मिळण्यासाठी मोठे मोर्चे काढले त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचे नेतृत्व मिळाले आणि त्यांनी उपोषण सुरु केले. सरकारने 30 दिवस मागितले जरांगे पाटील यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी अजून 10 दिवस जास्त दिले. तरीही मराठा आरक्षणावर निर्णय घेत नाही, आंदोलनाची टिंगल उडवली जाते. आरक्षणासाठी मराठा कधीपर्यंत शांत बसणार. आता आमचा उद्रेक होणार आहे. आमचा अंत पाहू नका. मराठा आमदार राजीनामे देण्याचे आश्वासन देत आहेत त्यांच्या हिंमत असेल तर तातडीने अधिवेशन बोलावून त्यात आवाज उठवावा. उपोषणाला 6 दिवस झाले आता हे आंदोलन दडपण्याचा पोलीस प्रशासनाकडून सरकार प्रयत्न करील; मात्र सर्वांनी सावध रहा, एकजूट महत्त्वाची आहे. मनोज जरांगे यांचा आदेश येईपर्यंत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन अंकुश राक्षे यांनी केले.