वर्पेमळ्यात शेतकऱ्यांनी अडवले होते काम
मंचर – पुणे-नाशिक नवीन महामार्गाच्या रस्त्याचे काम आंबेगाव तालुक्यातील कळंब गावातील वर्पेमळा येथील शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून अडविले होते. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व पोलिसांनी बुधवारी (दि. 28) दुपारी बैठक घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेतल्यानंतर शेतकऱ्यासमक्ष काम दोन ते तीन जेसीबी मशिनच्या सहाय्याने सुरु करण्यात आले.
शेतकरी शिवाजी दत्तात्रेय भालेराव, तुळशीराम महादू वर्पे, दगडू नारायण वर्पे, तान्हाजी बाबुराव वर्पे, विलास चिमाजी वर्पे यांच्यासह अनेक शेतकऱ्याशी राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता दिलीप शिंदे व पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद साधला. वर्पेमळ्यातील एका गटाला तीन लाख 52 हजार रुपये तर शेजारीच दुसऱ्या गटाला चार लाख 80 हजार रुपयांप्रमाणे मोबदला दिला आहे. याबाबत बाधित शेतकऱ्यांबाबत अजून निर्णय नाही, मग काम सुरु कसे, असा सवाल शेतकरी संजय वर्पे यांनी केला.
मोजणीत दाखविल्याप्रमाणे तुळशीराम वर्पे यांच्या मालकीची दीड गुंठे जमीन संपादित होते. प्रत्यक्षात पावणेचार गुंठे जमीन संपादित झाली आहे. जमीन मोजणीसाठी भूमीअभिलेख कार्यालयात गेल्यानंतर अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात. मोजणी होत नसल्याने वाढीव नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होईल. आमचा रस्त्यासाठी विरोध नाही. जमिनी संपादित केल्याप्रमाणे मोबदला थेट बॅंक खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी नामदेव भालेराव, संभाजी भालेराव, पांडुरंग भालेराव आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
पूर्वी जागेच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन मार्किंग करण्यात आले. त्याप्रमाणे रस्त्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना मोबदला दिला आहे. काही शेतकऱ्यांनी हरकती घेतल्याने त्याचे पैसे न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत.
-दिलीप शिंदे, सहायक अभियंता राष्ट्रीय महामार्ग