पिंपळगावमध्ये अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
राहू – दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले आहे.
अनेक दिवसांपासून राज्य सरकारने शेतकरीविरोधी धोरण आखल्यामुळे व नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांचा कृषीपंपाचा वीज जोड तोडण्याचा सपाटा लावला होता. त्याविरोधात शेतकरी संघटनेचे दीपक पवार व सहकाऱ्यांनी पिंपळगावच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.
कोणतीही पूर्वसूचना तसेच नोटीस न देता वीज जोड तोडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर होती. बिले चुकीच्या पद्धतीत आकारल्यामुळे बिलांचा आकडा हा मोठा दाखविला जात आहे. यासह अनेक तक्रारी होत्या. उपोषणकर्त्यांना अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले.
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आबा देवकर म्हणाले की, महावितरणने मागील सहा वर्षांपासून बिले न दिल्याने शेतकऱ्यांना बिलाचा डोंगर निर्माण झाला आहे. चुकीच्या धोरणामुळे परिस्थिती ओढवली आहे.
पिंपळगाव सब डिव्हिजनचे कनिष्ठ अभियंता पप्पू पिसाळ म्हणाले की, शेतकऱ्यांनी कमी-अधिक प्रमाणात बिले भरून मंडळाला सहकार्य करणे गरजेचे आहे, तरच अखंडित वीज देणे शक्य आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे दीपक पवार, सुनील नातू, तात्या गाडेकर, महेंद्र थोरात, राजेंद्र दिवेकर, रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आबा देवकर, संभाजी कुंजीर, दिनेश खळदे, शुभम देवकर, संदीप देवकर, अशोक देवकर, रघुनाथ देवकर, संजय बंड आदी
उपस्थित होते.
चुकीच्या पद्धतीने वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. महावितरणने यामध्ये सुधारणा न केल्यास पुढील काळात देखील आंदोलन केले जाईल.
– दीपक पवार, शेतकरी संघटना.