राहू – खामगाव गटातील परिस्थिती ः इच्छुकांच्या आशेवर पाणी
भाऊ ठाकुर
राहु – राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी राहू – खामगाव गट रचनेत आणखी बदल होणार आहेत. परिणामी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर अनेक दिवसांपासून इच्छुकांनी केलेल्या तयारीवर पाणी फिरले आहे. वारंवार बदलत्या निर्णयामुळे इच्छुकांची मात्र चांगलीच दमछाक सुरू झाली आहे.
मागील गट रचनेनुसारच आत्ताच्या नवीन गटाची रचना झाली होती, काही ठराविक गावे खामगाव गणात गेली होती. परंतु गट व दोन्ही गणाचे आताचे आरक्षण हे सर्वसाधारण आल्यामुळे अनेकांचे मनसुबे धुळीस मिळाले. त्यामुळे राहु – खामगाव गटात आरक्षणाचा झिरो पडल्याच्या चर्चेला गावागावांत उधाण आले होते. त्यातच नुकतेच शिंदे- भाजप सरकारने 2017 च्या वॉर्ड रचनेनुसार आगामी निवडणुका होणार आहेत. असा नवीन फतवा काढला आहे.
राहु – खामगाव गटात मराठा, माळी, धनगर समाजाचे चांगले वर्चस्व आहे. यामुळे राजकीय संधी मिळत असताना या पंचवार्षिकला नाही तर दुसऱ्या पंचवार्षिकला संधी मिळत असे, परंतु ग्रामीण भागातील अनेक गावे ही महानगर पालिकेत गेल्यामुळे जिल्हा परिषद गटाच्या संख्येचा कोटा पूर्ण करणे गरजेचे होते, व त्याचाच परिणाम म्हणून दौंडमध्ये जिल्हा परिषद गटात झालेली वाढ. या वाढीमुळे अनेक कार्यकर्त्यांची गणितेच चुकली. कारण राहू – खामगाव गटात आत्तापर्यंत सर्व समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून कमी जास्त प्रमाणात संधी मिळालेली होती. परंतु याचा जास्त फटका हा धनगर समाजाला मोठ्या प्रमाणात बसला होता.
मागील अनेक निवडणुकांमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. आत्ता जरा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती तर, नवीन गट निर्मितीमुळे सर्व अंदाज चुकून राहू – खामगाव गट व दोन्ही गण सर्वसाधारण जागेसाठी सुटले आहेत. दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात हे दोनच गट प्रभावी मानले जातात. त्यानुसार आता पुन्हा गण, गट रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु राज्य सरकारच्या बदलत्या निर्णयाचा फायदा कोणाला होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाने संपूर्ण तयारी सुरू केली आहे. पक्षाने संधी दिल्यास पूर्ण क्षमतेने मैदानात उतरू, तसेच पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
– पाटील यादव, सरपंच, पाटेठाण ग्रामपंचायत
सध्याच्या आरक्षण सोडतीत धनगर समाजाला संधी मिळणे गरजेचेचे होते. अनेक दिवसांपासून समाजाला संधी मिळालेली नाही. परंतु शिंदे- भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु निवडणूक रिंगणात तयारीनिशी उतरणार आहे.
– दत्ता टेळे, उपसरपंच टेळेवाडी