15 गावांमध्ये 244 जनावरांना लागण ः 20 अत्यवस्थ
राजगुरुनगर – खेड तालुक्यात विविध गावांतील आतापर्यंत 11 जनावरांचा लम्पीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. तालुक्यात 15 गावांतील 244 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली असून 20 पेक्षा जास्त जनावरे अत्यवस्थ आहेत.
खेड तालुक्यात जनावरांना होणाऱ्या लम्पी आजाराला रोखण्यात सुरुवातीला पशुवैद्यकीय विभागाला यश आले आले होते; मात्र नंतर तालुक्यात लम्पीचा प्रसार झाला. सुरुवातीला शासनाकडून वेळेत लस उपलब्ध न झाल्याने लम्पी चा प्रसार वेगाने झाला. तथापि अनेक शेतकऱ्यांनी गावागावातील सामाजिक कार्यकर्त्यानी लम्पीवरील लस खासगी खर्चाने उपलब्ध करून पशुधन वाचवले होते. तालुक्यात 20 गावांमध्ये आतापर्यंत 244 जनावरांना लम्पीची लागण झाली आहे.
97 पेक्षा जास्त जनावरे उपचारानंतर बरी केली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या पशुधनाला लम्पी आजाराची लागण झाल्याने व त्यात काही दुभती जनावरे दगावत असल्याने नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश शेळके यांनी सांगितले,
तालुक्यात वीस गावांमध्ये लम्पी आजाराने 11 जनावरे दगावली आहेत. 97 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. एकूण 244 जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. 60 हजारांपेक्षा जास्त जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. युद्धपातळीवर लसीकरण सुरु आहे. पुढील काळात लम्पी आजार आटोक्यात येईल.
आतापर्यंत 60 हजार जनावरांचे लसीकरण
खेड तालुक्यात 64,981 गायी बैल वासरे आहेत. 28,838 म्हशी, टोणगे, पारडे आहेत. सुमारे 32,800 शेळ्या व 3,513 मेंढ्या अशी एकूण पशुधनाची नोंद आहे. या सर्वांना आरोग्य सेवा देण्यासाठी तालुक्यात राज्य सरकारचे 13 दवाखाने तर पुणे जिल्हा परिषदेचे 24 दवाखाने कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून पशुधनावर उपचार केले जातात. लम्पी आजार तालुक्यात बळावत आहे आरोग्य विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत 60 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.