– कल्याणी फडके
94 व्या साहित्य संमेलनात “बालकट्टा’
पुणे – राज्याची सर्वात मोठी साहित्य चळवळ असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आता बाल साहित्यिकही सहभागी होणार आहे. यंदा त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी “बालकट्टा’ हे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. या संमेलन स्थळाला “कुसुमाग्रज नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. संमेलनासाठी उपलब्ध वेळ कमी आहे, मात्र संमेलनाची तयारी जोरदार सुरू असल्याचे नाशिकच्या आयोजकांनी सांगितले.
यंदाच्या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, मुलाखती, ग्रंथदिंडी, विविध कवीसंमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. पण याशिवाय प्रथमच “बालकट्टा’ निर्माण केला आहे. यामध्ये स्वरचित बाल कविता किंवा आवडीच्या कोणत्याही एका कवींची कविता बालकलाकारांना सादर करता येणार आहे. याशिवाय, बालसाहित्य मेळाव्याचेदेखील आयोजन करण्यात येणार असून, हे यंदाच्या 94 व्या संमेलनाचे वैशिष्ट्ये असल्याचे लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी नितीन मुंडावरे यांनीदेखील सोमवारी संमेलन स्थळाची पाहणी केली. यावेळी संमेलनाचे स्थळ, तेथील सुविधा आणि आराखड्याची पाहणी केली असून, संबंधीत खात्यांना सूचना दिल्या आहेत. यासह कोणतीही दुर्घटना घडल्यास किंवा कोणाला त्रास उद्भवल्यास संमेलन स्थळाच्या आवारातील रुग्णालयांमध्ये 5 बेड राखीव ठेवण्याची व्यवस्था प्रशासनाने केल्याची माहिती जातेगावकर यांनी दिली.
प्रक्षेपणदेखील विचारधीन
अनेकांना संमेलनाला येणे शक्य नसल्याने साहित्य संमेलनाचे “लाईव्ह’ प्रक्षेपण करण्याचा मंडळाचा मानस आहे. सध्या मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांतील सभागृहात लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे नियोजन असून, यामुळे रसिकांना संमेलन लाईव्ह पाहता येणार आहे. मात्र, खर्चाच्या अंदाजपत्रकानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जातेगावकर म्हणाले.