पुणे – रेल्वे प्रवासासाठी “कन्फर्म’ तिकीट मिळेल, यासाठी नागरिक अनेकदा एजंटद्वारे तिकीटे आरक्षित करतात. मात्र, या तिकिटांचा काळाबाजार अजूनही सुरूच आहे. मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या छापे टाकत सुमारे 7 हजार 700 हून अधिक तिकीटे जप्त केली. या तिकीटांची रक्कम सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांहून अधिक आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दलालांविरुद्ध मोहीम राबवली. सायबर सेलसह विविध इनपुटद्वारे आरपीएफने मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या विभागांत छापे टाकले. आरपीएफकडून प्रबलसह विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून “ई-टाउटिंग’ तपास, सायबरस्पेसवर पाळत ठेवणे, सीसीटीव्ही मॉनिटरिंग आदी करण्यात येत आहे. एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत 267 प्रकरणांची नोंद झाली असून, आतापर्यंत 328 जणांना अटक केली आहे. मागील वर्षी अशा 316 प्रकरणांची नोंद झाली होती. यामध्ये 1 कोटी 67 लाख किंमतीची 10 हजार 179 तिकिटे जप्त केली होती.
तिकीटे “ब्लॉक’ केल्यास पैसे बुडतील
प्रवाशांनी वैध तिकीट असल्यासच प्रवास करावा. अवैध तिकिटावर प्रवास करण्यास बंदी असून, कायदेशीर कारवाईवेळी तिकीट “ब्लॉक’ केले जाते. अशावेळी पैसेदेखील बुडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन ई-तिकिटींगमधील दलालांकडून तिकिटे खरेदी करू नयेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.