महाराष्ट्र कनेक्ट कॉन्क्लेव्ह अंतर्गत मुलाखत
पुणे – “गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात अनेक राजकीय संकटे निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आपण लढतो आहोत, हा लढणारा महाराष्ट्र आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षे देखील सुखरुप पार पडतील आणि त्या नंतरच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपने विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी ठेवावी,’ असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला. “महाराष्ट्रातील हा प्रयोग हा असाच सुरू राहिला, तर देशामध्ये देखील बदल अथवा नवा पर्याय देण्याची ताकद आपल्या राज्यात आहे. हे बदल करण्याचे सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते शरद पवारांमध्ये आहे,’ असे उद्गार राऊत यांनी काढले.
महाराष्ट्र कनेक्ट कॉन्क्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांची ज्ञानेश महाराव यांनी पुण्यात मुलाखत घेतली. सध्या महाविकास आघाडीचे काम व्यवस्थित सुरू आहे. महाविकास आघाडी लोकांच्या प्रश्नांसाठी लढत आहे. हे सरकार त्यांचा कार्यकाल पूर्ण करेल, असे शरद पवार म्हणाले.
हनुमान चालिसा प्रकरणावरून पवार म्हणाले, बृजभुषण सिंह ही कोणी मॅनेज करू शकेल अशी व्यक्ती नाही. कुस्तीच्या क्षेत्रात आम्ही एकत्र काम करतो. पण प्रत्येकाची मते वेगळी आहेत. बृजभुषण सिंह यांना मॅनेज करण्यात आले हे डोक्यातून काढून टाका. काश्मीरच्या परिस्थतीवर बोलताना पवार म्हणाले, काश्मीर फाइल्स हा सिनेमा जनमानसाचा मनात खोटी प्रतिमा तयार करणासाठी तयार केलेला आहे. पंडितांची हत्या होत होती तेव्हा भाजप सरकार होते. आजही भाजप सरकार आहे. पंडित घटकांना संरक्षण द्यायला अपयशी ठरले आहेत.’
आस्तिक-नास्तिक हा वैयक्तिक प्रश्न
आस्तिक-नास्तिक हा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याचा गवगवा करत नाही. पण, पंढरपूरचा विठोबा समोर असेल तर मी हात जोडतो. सामान्य माणूस त्याला संकटमोचक मानतो. त्याचा अनादर करू नये म्हणून मी हात जोडतो, असे पवार यांनी आस्तिक-नास्तिकतेच्या प्रश्नावर उत्तर दिले.
मैं झुकेगा नहीं…
आपला रुपया सच्चा मग दडपशाहीला घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत पवार यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य केले. याच विषयावर राऊत म्हणाले, “ईडीबाबत आम्ही 2024 नंतर उत्तर देऊ. वेळ आमचीही येईल. मै झुकेगा नही.’ असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.