पिंपरी – गेली तीन वर्षे पवना धरण हे सातत्याने शंभर टक्के भरत असतानाही पिंपरी-चिंचवड शहरवासियांवर लादलेली कृत्रिम पाणीटंचाई हे भाजपचे पाप आहे. पाच वर्षांपूर्वी आंद्रा आणि भामा आसखेडचे पाणी मंजूर झाल्यानंतरही संपूर्ण सत्ताकाळात केवळ टक्केवारीच्या भ्रष्ट राजकारणामुळे शहरवासियांचे अत्यंत हाल झाल्याने त्याची परतफेड शहरातील जनता महापालिकेच्या निवडणुकीत नक्कीच करेल आणि भाजपला सत्तेतून बेदखल करेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
भाजपच्या एकनाथ पवार यांनी शहरातील पाणीटंचाईचे खापर प्रशासनावर फोडले आहे. त्याबाबत पवार यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की,शहराचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पवना बंद पाइपलाइन ही योजना राष्ट्रवादीने राबविण्यास सुरुवात केली होती मात्र त्याला विरोध भाजपच्या नेत्यांनीच केल्याने ही योजना बंद पडली. यानंतर राष्ट्रवादीने आपल्या सत्तकाळात चोवीस तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रकल्प हाती घेतला होता.
सन 2017 मध्ये सत्ता गेल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी भाजपाची असताना गेल्या पाच वर्षांत त्यांना हा प्रकल्प पूर्ण करता आला नाही. सुरुवातीच्या अडीच वर्षांत पक्षनेता असलेल्या एकनाथ पवार यांनी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेची माहिती तारखेसह जनतेसमोर ठेवावी, असे आव्हानही गव्हाणे यांनी दिले आहे. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी महापालिकेत प्रशासक आलेला असतानाही आपले पाप लपविण्यासाठी प्रशासकावर पाणीटंचाईचे खापर फोडणे हे हास्यास्पद असल्याचेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.