पुणे – भाजप सरकारने सतत सत्तेचा गैरवापर करत ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या सरकारी यंत्रणांना हाताशी धरत त्यांची भीती दाखवत काही घटकांना अटक करण्याचे कामे केले आहे. सत्ताधाऱ्यांनी मुलभूत अधिकारावरच घाव घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांची ही भूमिका योग्य नाही, अशी टीका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात केली. आता देशातील सत्तेत परिवर्तन करण्याची आवश्यकता निर्माण झाली असून, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट यांच्या वतीने कॉॅंग्रेस भवन येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रदेश कॉॅंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते सचिन अहिर, खासदार सुप्रिया सुळे, चंद्रकांत हांडोरे, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार रवींद्र धंगेकर, विश्वजीत कदम, संजय जगताप, माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, जयदेव गायकवाड, दीप्ती चवधरी, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्यासह अभय छाजेड, संगीता तिवारी, संजोग वाघेरे, आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅरंटी म्हणून विविध योजनांची घोषणा केली. प्रत्यक्षात काही योजनांचे लाभार्थींना दिलेले धनादेश वटलेही नाहीत. योजनांची अंमलबजावणीच झाली नसल्याने आता मोदी यांचीच गॅरंटी राहिलेली नाही. राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविले जात नाहीत. राष्ट्र उभारणीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जात नाही.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्याचा एक कलमी कार्यक्रमच त्यांनी सुरू ठेवलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. मात्र सरकार शेतकरी यांच्या विविध प्रश्नांसंबंधीच्या आंदोलनाची दखल घेत नाही. सत्ताधाऱ्यांना शेतकरी, जनतेची काळजी नाही. शेतात गवतामधील तण बाजूला केले जाते, त्याप्रमाणे या सरकारला काढून फेकावे लागणार आहे, असे पवार म्हणाले.
देशातील व्यवस्था भ्रष्टाचारयुक्त करुन जनेतला लुटायचे धोरण सत्ताधाऱ्यांनी सुरू ठेवले आहे. खोटे बोलायचे हीच आता मोदी यांची गॅरंटी बनली आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आता सुराज्याचा पाया रचण्यासाठी मुठ बांधण्यात आली आहे. भाजप व्यवस्थेला समूळ नष्ट करण्याचे ध्येय इंडिया आघाडीने ठेवले आहे, असे पटोले यांनी सांगितले.
अंमली पदार्थ प्रकरणावरही भाष्य
राज्यात अंमली पदार्थांचे साठे सापडत असून, पाश्चिमात्यांपेक्षाही पुणे शहरातील वातावरण वाईट झाले आहे. अमली पदार्थांमुळे तरुण पिढी बरबाद होऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असेही पटोले यांनी सांगितले. विविध परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणाबाबत विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.