पुणे – कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला पुराने तडाखा बसल्याने मागील 7 दिवसांपासून बंद असलेल्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. तसेच, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बहुतांशी राज्य महामार्गही सुरू झाल्याने वाहतूक सुरळीत होत आहे.
गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर, सांगली शहर व ग्रामीण भागाला पूराचा तडाखा बसला आहे. यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत राज्य महामार्ग बंद ठेवले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू असून पोलीस प्रशासन योग्य नियोजन करून टप्या-टप्याने वाहने सोडत आहेत. पुणे-कोल्हापूर दरम्यान 4 टोलनाक्यांवरील कोंडीही कमी होत आहे. रविवारी दुपारी संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी करून रस्ता सुरू केल्याचे प्रशासनाने सांगितले.
वाहने सुटली
पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. परंतु, राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने मदतीसाठी गेलेली वाहने अडकलेली होती. यामध्ये वैद्यकीय पथके, औषधे, अन्नधान्य, कपडे, इंधनाचे टॅंकर यासारख्या अनेक वाहनांचा समावेश आहे. मात्र, रविवारी दुपारनंतर राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्यानंतर मदतकार्यासाठी गेलेली वाहने लवकर पोहोचणार आहेत.