पुणे – पुण्यात विधान भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला खासदार सुळे यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे तसेच आमदार रोहित पवार हे प्रथमच समोरासमोर आले. त्या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बैठकीला येण्यामागचे कारण सांगितले.
सध्याच्या राजकीय आरोप- प्रत्यारोपानंतर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि आमदार राजेश टोपे यांनी शनिवारी भेट घेतली. राजेश टोपे यांनी रायगडला जाण्यापूर्वी अजित पवारांची बंद दाराआड भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे शनिवारी विधान भवन परिसरात राजकीय भेटीवरुन चर्चा रंगली होती.
राजेश टोपे यांनी अजित पवार यांची पुण्यात विश्रामगृहात भेट घेतली. त्याबाबत विचारता सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. ते आता वेगळ्या विचाराच्या सरकारमध्ये काम करीत आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे आम्ही लोकांच्या समस्यांसाठी आम्ही सातत्याने सरकारमधील व्यक्तींना भेटत असतो, असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.
सुनेत्रा पवार या सध्या बारामती मतदारसंघात फिरत असून त्यांनी सुप्रिया सुळे या नेहमीच मदत करतात.
यावेळीही त्या मदत करतील असे म्हणाल्या. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी गेली १५ वर्ष लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी आहे. त्यापूर्वी दोन-तीन वर्ष मतदारसंघात काम केले आहे. मतदारसंघात फिरते त्यावेळी मला कुटुंबात फिरल्यासारखे वाटते. मतदारांशी माझे काही वैयक्तिक ऋणानुंबध आहेत. लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला मतदारसंघात फिरण्याचा अधिकार आहे.
दुष्काळी स्थितीबाबत…
दौंड, इंदापूर, बारामती आणि पुरंदरमध्ये पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न गंभीर आहेत. उजनी, नाझरे धरणात पाणी नाही. उन्हाळा वाढत आहे. त्यामुळे या तालुक्यातील पिण्याचे पाणी, शेती, गुरांच्या चाऱ्यासह छावण्याचा समस्या सोडविण्याचा राज्य सरकारने गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.