पुणे – रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने मागील 7 महिन्यांत विविध स्थानकांवर आढळलेल्या सुमारे 477 बालकांना पालकांच्या स्वाधीन केले आहे. यापैकी पुणे विभागात सर्वाधिक म्हणजेच 171 बालके आढळली आहेत.
भांडणे, परिवारातील तंटे, ग्लॅमरचे वेड आदी कारणांमुळे अनेकदा शालेय वयातील मुले, तरुण घरातून पळून येतात. महानगरांतील रेल्वे स्थानकांत बऱ्याचदा ही मुले दाखल होतात. प्लॅटफॉर्म, रेल्वे स्थानकांचे आवार आदी ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना आढळणाऱ्या या मुलांना दलाकडून विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने पालकांकडे स्वाधीन करण्यात येते.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 7 महिन्यांत सुमारे 477 मुलांना पालकांकडे स्वाधीन केले असून, यात 310 मुले आणि 167 मुलींचा समावेश आहे. जुलै महिन्यातच विविध स्थानकांतील 73 बालकांची सुटका करण्यात आली. 14 जुलै रोजी हडपसर रेल्वे स्थानकात देखील 14 वर्षीय मुलगी आढळली होती. संबंधित मुलगी आई ओरडल्यामुळे रेल्वेने पळून आली होती. या मुलीला कर्मचाऱ्यांनी सामाजिक संस्थेकडे सोपविले आहे.
घरातून पळून गेलेल्या मुलांच्या समस्या समजून त्यांना त्यांच्या परिवाराकडे सोपविण्यात येते. यामध्ये आरपीएफची भूमिका महत्त्वाची असून, त्यांच्याकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येते, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी सांगितले.
इतक्या बालकांची सुटका
पुणे विभाग 171
मुंबई विभाग 166
भुसावळ विभाग 70
नागपूर विभाग 40
सोलापूर विभाग 30