अकोले -तापमान वाढ आणि निसर्ग वादळाने उन्हाळी कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसान झालेल्या कांद्याचे पंचनामे करावेत, अशी मागणी अकोले तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील वर्षीप्रमाणेच उन्हाळी कांदा यावर्षी साथ देईल, ही अपेक्षा कांदा उत्पादकांसाठी भ्रमनिरास ठरली आहे. मे महिन्यात 38 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले. त्यानंतरच्या ताशी 45 कि. मी. वेगाचे वादळ आणि पाऊस यात साठवलेला कांदा भिजला. शेतातील कांदा साठविण्यासाठी लगबग उडाली असतानाच प्लॅस्टिक कागदाने झाकलेला जवळपास 60 टक्के कांदा जागेवर सडला आहे. चाळीत साठवलेला अनेकांचा कांदाही वादळात भिजल्याने सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काहींनी पत्र्याच्या शेडमध्ये कांदा साठवून ठेवला. मात्र वाढलेल्या तापमानामुळे हा कांदा सडून गेला आहे.
सध्या एक व दोन नंबर कांद्याला 800 ते एक हजार 100 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव आहे. त्यानंतरचा कांदा मात्र 200 रुपये प्रतिक्विंटल इतक्या कमी बाजारभावात विक्री होत आहे. शेतातील आणि चाळीतील कांदा सडण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने बाजारात कांदा घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांची घाई सुरु आहे. कांदा सडण्याचे प्रमाण वाढल्यास आवक वाढून बाजारभाव गडगडण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
निसर्ग वादळामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चाळी उडून गेल्या. कांदा मोठ्या प्रमाणावर भिजला. कांदा उत्पादकांना या आपत्तीचा लाखोंचा फटका बसेल. शासन आणि प्रशासनाने नुकसानग्रस्त कांद्याचे पंचनामे करुन भरपाईची तरतूद करावी, अशी मागणी राजेंद्र वाकचौरे, सोमनाथ कुमकर, अण्णासाहेब गोर्डे, चंद्रशेखर आंबरे, कैलास जाधव, बाबासाहेब वाकचौरे, नानासाहेब वाकचौरे, भगवान थोरात, बाळासाहेब अस्वले, सुभाष आंबरे आदींसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.