नवी दिल्ली – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या तिसऱ्या वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे “कनेक्टिंग, कम्युनिकेटिंग, चेंजिंग’ या ई-पुस्तकाचे आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रकाशन केले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या पुस्तकाच्या कॉफी टेबल आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले. नवी दिल्लीतील उपराष्ट्रपती निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या पुस्तकात उपराष्ट्रपतींच्या कारकिर्दीतील विविध घटना, कामे तसेच देश-विदेशातील दौरे यांची चित्रमय माहिती संकलित करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतींनी शेतकरी, वैज्ञानिक, डॉक्टर्स, युवक, प्रशासक, उद्योग प्रतिनिधी आणि कलाकार अशा विविध क्षेत्रातील लोकांशी साधलेल्या संवादाची माहिती आणि क्षणचित्रे देखील या पुस्तकात बघायला मिळतील. पराष्ट्रपतींचे परदेश दौरे, जागतिक नेत्यांशी केलेल्या चर्चा, भाषणे यांचीही माहिती या पुस्तकात आहे.
ई-पुस्तकाचे प्रकाशन करताना जावडेकर म्हणाले की, हे पुस्तक संवादाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून आणि भारतामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आहे आणि या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती असून उपराष्ट्रपतींच्या भाषणांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मौल्यवान खजिना आहे. भाषणे विचार व भावनांनी परिपूर्ण असून ओघवत्या भाषेत आहेत असेही त्यांनी नमूद केले. कॉफी टेबल बुक आणि त्याची ई-आवृत्ती छापल्याबद्दल मंत्र्यांनी प्रकाशन विभागाचे अभिनंदन केले.
या प्रसंगी रक्षामंत्री राजनाथ सिंह म्हणाले की वक्तृत्व ही एक कला आहे आणि उपराष्ट्रपती अगदी मनापासून बोलतात आणि त्यांची भाषणे ही त्यांचे विचार व भावना यांचे प्रतिबिंब असतात. एक पिढी दुसऱ्या पिढीला एक उत्तम भेटवस्तू म्हणून देऊ शकणारी गोष्ट म्हणजे एक चांगले पुस्तक आणि वाचक ते पुस्तक वारंवार वाचत राहतील.
प्रकाशनामध्ये मुख्यत: उपराष्ट्रपतींच्या ध्येय आणि त्याचे निष्कर्षांना परिभाषित करण्यात आले आहे असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.