पंचनामे करण्याचे आदेश : 39 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
देहुरोड – अवकाळी पावसाने देहू, विठ्ठलवाडी, माळवाडी परिसरातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर यांनी मंगळवारी (दि. 5) सकाळी पाहणी केली. महसूल विभागाचे तलाठी आणि कृषी अधिकारी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
तीर्थक्षेत्र देहू, विठ्ठलवाडी, माळवाडी तसेच तळवडे हद्दीवरील अवकाळी पावसाने झालेल्या शेतातील पिकांची व शेतीची पाहणी करण्यासाठी प्रांत अधिकारी बारवकर तीन किलोमीटर पायी फिरत शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. या वेळी गाव कामगार तलाठी अतुल गीते, कृषी अधिकारी एम.आर. पावडे, मनीषा शिरसाठ, सरपंच पूनम काळोखे शेतकरी उपस्थित होते.
अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, भुईमूग, भाजीपाला आदी पिके उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत.
देहू, विठ्ठलवाडी, माळवाडी परिसरातील अद्यापपर्यंत सुमारे दोनशे चोवीस शेतकऱ्यांच्या शेतांची पंचनामे करण्यात आले आहेत. 39 हेक्टर पिकांची नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती कृषी अधिकारी पावडे यांनी दिली. अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे करणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
यामध्ये देहू परिसरातील 55 शेतकऱ्यांचे नऊ हेक्टर, माळवाडी येथील 64 शेतकऱ्यांचे 11 हेक्टर, विठ्ठलवाडी येथील 105 शेतकऱ्यांची 19 हेक्टर असून, त्यामध्ये 2 हेक्टर भात, 33 हेक्टर सोयाबीन, 2 हेक्टर भाजीपाला, 2 हेक्टर भुईमूग असे शेतपिकांचे नुकसान झाले आहेत. प्रांताधिकारी बारवकर यांनी गाव कामगार तलाठी गीते तसेच कृषी अधिकारी यांनी पंचनामे करून घेण्याचे सूचनाही केल्या.