पुणे -राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने महाराष्ट्रातील पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढवण्याच्या आपल्या महत्त्वकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये या क्षेत्राची क्षमता ओळखून राज्यातील पर्यटन आणि त्याला पूरक व्यवसायाला चालना देताना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अद्वितीय सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक संपत्तीचा लाभ घेण्याचे महाराष्ट्र पर्यटनाचे उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, पर्यटन संचालनालयाने पुण्यामध्ये दुसरे देशांतर्गत कॉन्क्लेव्ह आयोजित केले होते. यामध्ये शहरातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत नामांकित सहल आयोजक, आणि शहरातील आणि आसपासच्या साहसी आणि कृषी पर्यटन युनिट्ससह प्रवासी व्यवसायिक यांना सहभागी करून घेण्यात आले होते. महाराष्ट्राला पर्यटनाचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामध्ये अगदी मुंबईचे गजबजलेले महानगर, लोणावळा आणि महाबळेश्वर, पाचगणी ही आकर्षक हिल स्टेशन्स, कासपठार, प्राचीन अजिंठा आणि वेरूळची लेणी आणि अलिबाग, आंजर्ले, गुहागर, आरे-वारे, मिठाबाव, तारकर्ली, दिवे आगार, गणपतीपुळे, हरिहरेश्वर आदी समुद्रकिनारे यासारख्या प्रसिद्ध ठिकाणे राज्यात आहेत. याशिवाय अनेक धार्मिक स्थळे, गडकिल्लेही आहेत. यामुळे महाराष्ट्राचे अलौकिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रदर्शन करून, पर्यटन विभागाने राज्याला जगभरातील पर्यटकांसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून स्थान देण्याचा मानस आहे.
महाराष्ट्राला विपुल नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक क्षमतांचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्राची अद्वितीय ऑफर जगासमोर दर्शविणे आणि त्यास एक अग्रगण्य पर्यटन आणि व्यापार स्थळाचे स्थान देण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही शाश्वत विकासासाठी आणि पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील म्हणाले.