मुंबई – ज्येष्ठ पटकथा लेखक प्रयाग राज (prayag raj) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. “अमर अकबर अँथनी”, “नसीब” आणि “कुली” अशा अनेक हिंदी सुपरहिट चित्रपटांचे कथा लेखन त्यांनी केले आहे. (writer prayag raj)
त्यांचा मुलगा आदित्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे शनिवारी संध्याकाळी त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी निधन झाले. गेली आठ ते दहा वर्षे ते हृदयविकार आणि वयाशी संबंधित समस्यांमुळे आजारी होते असे आदित्य यांनी पीटीआयला सांगितले. त्यांनी सुहाग, मर्द अशा चित्रपटांसह एकूण सुमारे शंभर चित्रपटांचे कथा लेखन केले आहे. राजेश खन्ना यांचा “रोटी”, धर्मेंद्र-जीतेंद्रचा “धरम वीर” रजनीकांत आणि कमल हासन स्टारर “गिराफ्तार” या चित्रपटांसाठीहीं त्यांनी कथा लेखन केले आहे. लेखक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट जमानत हा होता. (Bollywood)
रविवारी सकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत राज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील त्याचे मित्र उपस्थित होते.
त्यांच्या निधनाबद्दल अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आम्ही आमच्या महान चित्रपट उद्योगाचा आणखी एक आधारस्तंभ गमावला,असे त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. अभिनेते अनिल कपूर, शबाना आझमी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनिल कपुर यांच्या हिफाजत चित्रपटाचे पटकथा लेखनही प्रकाश राज यांनी केले होते.