नवी दिल्ली – देशात जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्या असून या अवस्थेत देशातील जनता दिवाळी कशी साजरी करणार असा सवाल करीत कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रियंकांनी कांदा, साखर आणि डाळींच्या अचानक वाढलेल्या किमतीवर चिंता व्यक्त केली.
दिवाळीला एक आठवडा बाकी आहे, पण याच काळात खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, असे त्यांनी एक्सवरील पोस्टवर म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कांद्याचे भाव अचानक वेगाने वाढू लागले आहेत, भारत हा कांदा उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. गेल्या वर्षी आपल्या शेतकरी बांधवांनी 31 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन केले. तो कुठे आहे? त्या मोठ्या उद्योगपतीच्या गोदामात? की सरकारी गोदामात ते निष्काळजीपणामुळे सडले? असा सवालही प्रियांका गांधी यांनी केला आहे.
दुसरीकडे साखरेव्यतिरिक्त अरहर आणि उडीद डाळीही नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. लोक स्वता काय खाणार आणि दुसऱ्याला काय देणार असा सवाल करीत त्यांनी सणाचा आनंद कसा साजरा करणार? सरकारने उत्तर द्यावे,असे आवाहन केले आहे. देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी या विषयावर कॉंग्रेस केंद्र सरकारवर सतत हल्लाबोल करीत आहे.