नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या कॉंग्रेस पक्षाच्या कॅप्टन आहेत आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष हा भाजपसाठी प्रमुख आव्हान ठरेल, अशी खात्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीत स्वतःला कशाप्रकारे सादर करायचे याचे निर्णय प्रियांका गांधींनाच घ्यायचा आहे, असेही खुर्शिद म्हणाले.
उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत आघाडी करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष वाट बघत बसणार नाही. आतापर्यंत कोणाचीही कॉंग्रेसची चर्चा झालेली नाही. केवळ अंदाज बांधण्यात काहीही अर्थ नाही. आपल्या एकट्याच्या पूर्ण क्षमतेनिशी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्याचे कॉंग्रेस पक्ष प्रयत्न करेल, असेही खुर्शिद म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियांका गांधी या कॉंग्रेसच्या उमेदवार असतील का, असे विचारले असता त्यांनी तसे संकेत देईपर्यंत आपण या प्रश्नाचे उत्तर देणार नाही. भावी मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ आणि प्रियांका गांधी यांचे फोटो शेजारी शेजारी ठेवले तर हा प्रश्न विचारावा लागणार नाही, असेही खुर्शिद म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या मतदारांपुढे स्वतःला कसे सादर करायचे याचा निर्णय त्या स्वतःच घेतील, असे त्यांनी जोर देऊन सांगितले.