लखनौ – सितापूर येथील विश्रामगृहात 24 तासांपेक्षा अधिक काळ नजर कैदेत ठेवल्यानंतर प्रियंका गांधी यांच्यासह किमान 10 जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. दखलपात्र गुन्हा रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चेन्नी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी सायंकाळी भेट घेतली. त्यांनी लखीमपूर घटना, कृषी कायदे रद्द करावेत अशा अनेक मागण्यांवर चर्चा केली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री आशिष मिश्रा यांच्या कथित मोटारीखाली चार आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर झालेल्या हिंसाचार एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी लखीमपूर खेरा येथे जात असताना प्रियंका गांधी यांना रोखण्यात आले. देशांत अनेक ठिकाणी कॉंग्रेसने निदर्शने सुरू केली आहेत.
प्रियंका यांच्याशिवाय कॉंग्रेस नेते दीपेंदरसिंग हुडा, उत्तर प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू, आमदार दीपकसिंग यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. त्याच्यावर फौजदारी दंड संहितेच्या कलम 151 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एकूण आम्ही 11 जणांना या प्रकरणात अटक केली आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास लखीमपूर खेरा येथे जाण्यापासून रोखण्यात आले. तेथे परिस्थिती ठिक नसल्याने तेथे जाऊ नये, असे आम्ही आवाहन केले. तेथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यांनी आमचे ऐकले नाही. आम्ही सुयोग्य बंदोबस्तात त्यांना सीतापूर विश्रामगृहात आणले, असे हरगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार ब्रिजेश कुमार यांनी सांगितले. त्यापुढील कारवाई वरीष्ठांच्या सूचनेनुसार करण्यात आली, असे ते म्हणाले.
दरम्यान छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बहल म्हणाले, लखनौ विमानतळावर जाण्यापासून मला रोखण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र तेथे कार्यक्रम घेतला. मी लखीमपूर खेराला जात नाही असे सांगूनही मला अडवण्यात आले. कॉंग्रेस नेते नवज्योयसिंग सिध्दू यांनीही एका दिवसांत प्रियंका गांधी यांची सुटका न केल्यास लखीमपूर खेराला जाण्याची घोषणा केली. प्रियंका यांच्या अटकेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरवात झाली असून देशांत अनेक ठिकाणी कॉंग्रेसने निदर्शने सुरू केली आहेत.
शरद पवार यांच्याकडूनही निषेध
लखीमपूर घटनेने जालीयनवाला बाग नरसंहाराची आठवण झाली. केंद्र सरकार आणि योगी सकार यासाठी जबाबदार ाहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत ते एकटे नाहीत आम्ही सर्व जण त्यांच्या सोबत आहोत असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांन द्दिल्लीत पत्रकरारांना सांगितले.
“मला सीतापूर विश्रामगृहात गेल्या 38 तासांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी मला कलम 151 नुसार अटक केल्याचे तोंडी सांगितले आहे. पण मला एफआयआर किंवा कोणताही आदेश दाखवण्यात आलेली नाही. माझ्यावर बेकायदा कारवाई करण्यात आली आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांना ताब्यात घेताना बळाचा वापर करण्यात आला.”
– प्रियंका गांधी, (कॉंग्रेस नेत्या)