कागदपत्रं गहाळ होण्याची भीती ः अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
रांजणगाव गणपती (पुणे)- शिरूर तालुक्यातील महसूल विभागाला भ्रष्टाचाराचे ग्रहण तर लागले आहेच; पण त्याचबरोबर तालुक्यातील बहुतांश अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी हे आपले काम करून घेण्यासाठी व मलई गोळा करण्यासाठी खासगी व्यक्तिंचा वापर करून घेत आहेत. याबाबत विविध सामाजिक संघटनांनी व नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवला; मात्र महसूल प्रशासनाने याकडे पूर्णतः डोळेझाक केली आहे.
सध्या महसूल विभागाच्या वतीने जुन्या कागदपत्रांच्या नुतनीकरणाचे काम युद्धपातळीवर चालू आहे. यात काही कामगार तलाठी याठिकाणी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी खासगी नागरिकांचा वापर करत असल्यामुळे त्यातील काही कागदपत्रे गहाळ झाली किंवा काही चोरी झाली तर याला जबाबदार कोण? हे कोणी सांगू शकणार नाही.
शिरूर विभागाचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांच्या समोर हा कारभार सुरू आहे. अनेकदा सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माया गोळा करण्यासाठी अशा खासगी नागरिकांचा केला जात आहे. भूमी अभिलेखमध्ये काम करणाऱ्या खासगी व्यक्तिने एखाद्या शेतकऱ्यांची कागदपत्रं गहाळ केली तर एखाद्या शेतकऱ्याला नाहक मानसिक त्रासाला व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत तहसीलदार लैला शेख व प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख दखल घेणार का? संबंधित कामगार तलाठ्यांवरती कारवाई होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच भूमीअभिलेख व महसूल हे विभाग शेतकऱ्यांशी संबंधित असल्यामुळे याबाबत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे आहे.