मुंबई – केंद्र सरकार कर्ज घेऊन खर्च करीत आहे. इतरही सर्व आघाड्यावर जोरदार हालचाली चालू आहेत. मात्र भारतातील खासगी गुंतवणूक आणखी सक्रीय नसल्याचे मत रिझर्व्ह बॅंकेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आले आहे.
विविध अभ्यास अहवालातून मागणी वाढू लागल्याचे दिसत आहे. मात्र याची दखल खाजगी क्षेत्राने घेतलेले नाही असे नमूद करण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत सर्व क्षेत्रांनी जोखीम घेऊन धडाडीने पुढाकार घेण्याची गरज आहे.
मात्र काही क्षेत्र अजूनही हातचे राखून काम करत असल्याची भावना रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा यांनी तयार केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आली. गेल्या आठवड्यात वाढीव विकास दराची जाहीर झालेली आकडेवारी पाहता भारतीय अर्थव्यवस्था ज्या वेगाने कमी घसरली त्या वेगाने वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या काळात खासगी क्षेत्र गाफील राहिले तर नकारात्मक परिणाम रेंगाळू शकतो.