सर्वपक्षीय उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब; गोरे बंधूंपुढे तगडे आव्हान
सातारा – बहुचर्चित “आमचं ठरलंय’ आघाडीतून अखेर माण-खटाव मतदारसंघात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा सोमवारी झाली. साताऱ्यात झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत देसाईंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर पत्रकार परिषदे याबाबतची घोषणा माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केली.
पत्रकार परिषदेस माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अनिल देसाई, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, शिवसेनेचे नेते रणजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार मोरे, जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन खाडे यांची उपस्थिती होती.
माजी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर गुंडगिरीचा आरोप करून त्यांच्याविरोधात गेली दोन महिने आघाडी उघडणाऱ्या या सर्वपक्षीय नेत्यांची “आमचं ठरलंय’ ही टीम चर्चेचा विषय झाली होती.
नेमका उमेदवार कोण? ही आघाडी शेवटपर्यंत एक राहणार का, असे प्रश्न निर्माण झाले होते. आता तब्बल दोन महिन्यांनी या आघाडीकडून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डॉ. येळगावकर म्हणाले, माण-खटाव मतदारसंघातील अपप्रवृत्तींना हद्दपार करण्यासाठी आणि विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही सर्व जण मतभेद विसरून एकत्र आलो आहोत. अनिल देसाई म्हणाले, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन. मतदारसंघात सुरू असलेली गुंडगिरी मोडीत काढून जनतेला दहशतीमुक्त जगता यावे यासाठी प्रयत्न करेन.
विकासाच्या बाबतीत किमान 25 वर्षे मागे गेलेला मतदारसंघ सर्वांच्या सहयोगाने पुन्हा राज्यात विकसाचे रोल मॉडेल म्हणून पुढे आणू. रणजित देशमुख, प्रभाकर देशमुख या इच्छुकांनी आपण देसाईंच्या उमेदवारीवर खूश असून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणू, असे सांगितले. त्याच वेळी आपण नाराज नसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. राष्ट्रवादीने या मतदारसंघात उमेदवार उभा केला तर तुमची काय भूमिका असेल, या प्रश्नावर प्रभाकर घार्गे म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठांशी बोलूनच आम्ही निर्णय घेतल्याने कोणती अडचण येणार नाही.
संदीप मांडवेंचं “वेगळंच’ ठरलंय?
खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनीही विधानसभेच्या मैदानात येणारच, अशी हाळी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर ते “आमचं ठरलंय’ सोबतही होते. मात्र, सोमवारी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेला गैरहजर राहून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. याबाबत “प्रभात’शी बोलताना ते म्हणाले, मी राष्ट्रवादीकडे तिकीट मागितले असून माझी पक्षनेतृत्वासोबत बोलणी सुरू आहेत. राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तरी या निवडणुकीत मतदान यंत्रावर तुम्हाला संदीप मांडवे हे नाव दिसेलच.