Prithvi Shaw – देशात सध्या रणजी करंडक स्पर्धेचा थरार सुरु आहे. अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कौशल्याला जगासमोर आणले आहे. भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी या स्पर्धेलाच प्रमुख पायरी मानली जाते. याच स्पर्धेत भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ धावांचा पाऊस पडताना दिसतोय. त्याने मुंबईकडून खेळताना आसामविरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. यावेळी त्याने रणजी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या केली आहे. पृथ्वीने ३८३ चेंडूत ३७९ धावांची मोठी खेळी खेळून अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. या खेळीदरम्यान त्याने ४९ चौकार आणि ४ षटकार लागले आहेत.
भारतीय संघात निवड होत नसल्याने पृथ्वीने कायम नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, निवड होत नसल्याने खचून न जात त्याने कायम आपल्या खेळावर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्याच्या या ऐतिहासिक खेळीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीदेखील पृथ्वीच्या या खेळीची प्रशंसा केली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पृथ्वीचे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे. पृथ्वीच्या खेळीचा आणि घरेलू क्रिकेटचा आभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पृथ्वीनेही जय शाह यांच्या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे.
Another entry into the record books! What an extraordinary inning @PrithviShaw! Congratulations on hitting the second-highest Ranji Trophy score of all time. A talent with immense potential. Super proud! @BCCIdomestic pic.twitter.com/0MsturQSpD
— Jay Shah (@JayShah) January 11, 2023
Thank you so much @JayShah sir. Your words of encouragement means a lot. Will keep working hard. https://t.co/RoDw5FbUEV
— Prithvi Shaw (@PrithviShaw) January 11, 2023
३२ वर्ष जुना विक्रम मोडला
पृथ्वीने रणजी करंडक स्पर्धेमध्ये ३७९ धावांची मोठी खेळी करत माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याचा विक्रम मोडला आहे. मांजरेकर यांनी रणजी करंडक स्पर्धेच्या १९९०-९१ मध्ये हैदराबादविरुद्धच्या सामन्याच्या एका डावात ३७७ धावा केल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर भाऊसाहेब निंबाळकर यांचे नाव आहे. त्यांनी १९४८-४९ मध्ये सौराष्ट्रविरुद्ध खेळताना ही ऐतिहासिक खेळी खेळली होती. त्यानंतर अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आलेली नाही. पृथ्वीने तब्बल ३२ वर्षांनंतर मांजरेकर यांचा विक्रम मोडला असून आता तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
पृथ्वीच्या या खेळीमुळे आता त्याची भारतीय संघाच्या आगामी काळातील मालिकांसाठी संघात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. भारतीय संघ सध्या श्रीलंका विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध मालिका खेळणार आहे. भारतीय संघासाठी यंदाचे वर्ष अत्यंत महत्वाचे असणार आहे. कारण यंदाच्या वर्षातच क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे एकदिवसीय विश्वचषक भारतातच खेळवला जाणार आहे.