आळंदी – येथील आळंदी कार्तिकी यात्रेवर करोनाचे सावट आहे. आळंदी कार्तिकी यात्रा भरविण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यास आळंदीत नागरिक, भाविक यांच्या सुरक्षेसह
आरोग्याची काळजी घेत यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देताना भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यासह प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना खेडचे प्रांत विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनास दिल्या.
माऊलींच्या 725 व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या तयारीचा नियोजन पूर्व आढावा घेण्यासाठी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी मंदिरात शुक्रवारी (दि. 29) बैठक झाली. त्यावेळी प्रांत चव्हाण यांनी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, विविध संस्थांचे मान्यवर, नागरिक यांच्याशी सुसंवाद साधून आढावा घेत प्रशासनाला विविध सेवा सुविधा उपलब्ध
ठेवण्यासाठी सूचना दिल्या. आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस, खेड महसूल, वीज वितरण, आरोग्य व पाणीपुरवठा विभाग अशा विविध शासकीय तसेच अशासकीय संस्थांचा आळंदी कार्तिकी यात्रेबाबतचा नियोजन पूर्व आढावा प्रांत चव्हाण यांनी सुसंवाद साधत घेतला.
नगरप्रदक्षिणा मार्गावर पदपथावर पथारीवाल्यांमुळे गैरसोय होऊन रहदारीला अडथळा व भाविकांच्या रहदारीला प्रदक्षिणेस गर्दीमुळे गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी पोलीस प्रशासनाने केली. तसेच सुरळीत वाहतुकीचे नियोजन, वाहन पार्किंग यासाठी प्रांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
प्रत्येक विभागाने आपापले प्रस्ताव तात्काळ दिवाळी पूर्वी सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी नियोजन पूर्व आढावा प्रांत चव्हाण यांनी घेतला. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,
विश्वस्त विकास ढगे, अभय टिळक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, शंकरराव कुऱ्हाडे, मंदिर व्यवस्थापक माऊली वीर, मारुती कोकाटे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, संजय गिरमे आदींनी चर्चेत भाग सहभाग घेतला.
27 नोव्हेंबरपासून कार्तिकी यात्रा
आळंदीत कार्तिकी यात्रा 27 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 2 डिसेंबरला श्रींचा संजीवन समाधी सोहळा साजरा होणार आहे. 25 नोव्हेंबरपूर्वी भाविक नागरिकांना विविध नागरी सेवा सुविधा देण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे प्रांत चव्हाण यांनी नमूद केले.