- “बीव्हीजी’च्या हस्तकांची आयुक्त कक्षासमोर लुडबुड
- बेकायदेशीर मुदतवाढ दिल्यास कायदेशीर प्रक्रिया निर्माण होण्याची शक्यता
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथील कचरा डेपोमध्ये जुन्या डंम्पिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेची मुदत आज, बुधवारी (दि. 13) संपुष्टात येत असताना “बीव्हीजी’च्या हस्तकांसह काही राजकीय नेत्यांची निविदेला मुदतवाढ द्यावी यासाठी आयुक्तांवर दबाव वाढविला आहे. त्यामुळे आयुक्तांनी बेकायदेशीररित्या मुदतवाढ दिल्यास या प्रकरणी कायदेशीर तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काही निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये मोशी येथील कचरा डेपोमधील जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासंदर्भातील 42 कोटी 95 लाखांच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेचा 30 दिवसांचा प्रसिद्धी कालावधी आज (बुधवारी) दुपारी तीन वाजता संपुष्टात येत आहे. यासाठी आतापर्यंत पाच ठेकेदार निविदा प्रक्रियेत सहभागी झाल्याचे समोर आले आहे. मात्र बीव्हीजी या ठेकेदाराने मुदतीत निविदा भरलेली नाही. तसेच हे काम आपल्यालाच मिळावे यासाठी त्यांनी मुदतवाढीसाठी आयुक्तांच्या कक्षासमोर दुपारी लुडबुड चालविण्याचे दिसून आले.
कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही निविदेची मुदत वाढवायाची झाल्यास संबंधित निविदा प्रक्रियेमध्ये तीनपेक्षा कमी ठेकेदार सहभागी झालेले असणे अपेक्षित आहे. अथवा अत्यंत सक्षम कारण असल्यासच निविदा कालावधी वाढविता येऊ शकतो. मात्र महापालिकेमध्ये बेकायदेशीर कामांचा निर्माण झालेला प्रकार या निविदा प्रक्रियेसाठीही लागू करण्यासाठी ठेकेदार आणि काही राजकीय नेत्यांची धडपड सुरू आहे. आयुक्तांनी बेकायदेशीररित्या मुदत वाढ दिल्यास ज्या ठेकेदारांनी मुदतीत निविदा भरली आहे, त्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यामुळे महापालिका आयुक्तांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राजकीय हस्तक्षेप
महापालिकेच्या अनेक कामांमध्ये सध्या राजकीय हस्तक्षेपाचा कडेलोट झाला आहे. बायोमायनिंगच्या मुदतवाढीसाठी एका खासदाराचा महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना सातत्याने फोन सुरू होता. तर बीव्हीजीचे काम पाहणारे दोघेजण आयुक्तांच्या केबीनबाहेर घुटमळत होते. आयुक्तांनी राजकीय आणि ठेकेदाराच्या दबावातून बेकायदेशीर निर्णय घेतल्यास महापालिकेची प्रतिमा मलिन होणार असून, सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.