थेन आनमन चौकातील द ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे पार पडलेल्या कम्युनिस्ट पार्टी कॉंग्रसच्या सभेत चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या भाषणातून त्यांची साम्राज्यवादाची, विस्तारवादाची महत्त्वाकांक्षा नव्याने अधोरेखित झाली आहे.
चीनमधील साम्यवादी पक्षाच्या सर्वांत मोठ्या राजकीय सोहळ्याला संबोधताना राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी केलेले भाषण हे एखाद्या अनभिषिक्त सम्राटासारखे होते. या भाषणातून अत्यंत राजेशाही भाषेत त्यांनी जगाला एक संदेशवजा इशारा दिला आहे. त्यानुसार, चीनच्या गाभ्याच्या विषयांवरून मागे फिरण्याचा त्यांचा कोणताही इरादा नाही हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शून्य कोविड धोरणापासून तैवान, लाचखोरीविरोधी अभियान आणि चीन प्रभुत्ववादी धर्म यांसारख्या त्यांच्या प्रमुख अजेंड्यांचा समावेश आहे. चीनच्या उज्ज्वल भविष्याविषयीच्या त्यांच्या संकल्पना स्पष्ट असून ते कोणत्याही परिस्थितीत निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दिशेने चीनला घेऊन जाणार आहेत. चीनला नव्या युगामध्ये घेऊन जाण्याचे सामर्थ्य केवळ आपल्यातच आहे, असे त्यांच्या भाषणातून स्पष्टपणाने अभिप्रेत होते. थेन आनमन चौकातील द ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे पार पडलेल्या कम्युनिस्ट पार्टी कॉंग्रेसच्या सभेत दोन हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर जिनपिंग यांनी सुमारे दोन तास भाषण केले.
सलग तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्याने जिनपिंग हे माओ त्से तुंग यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या पंक्तीत सामील झाले आहेत. या शक्तीचे प्रतिबिंब त्यांच्या भाषणात दिसणे हे तसे स्वाभाविकच म्हणायला हवे. आता आगामी पाच वर्षांच्या कार्यकाळात जिनपिंग यांची नजर आपल्या उद्दिष्टपूर्ततेवर असणार आहे. यामध्ये चीनचा भव्य कायापालट करण्यासारख्या त्यांच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचा समावेश असून त्यांची पूर्तता करून जिनपिंग हे आपली एकाधिकारशाही अधिक भक्कम करताना दिसतील. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्त्वासाठी खासकरून जिनपिंग यांच्यासाठी तैवानइतका अन्य कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाहीये. साम्यवादी पक्षाच्या परिषदेतील भाषणातही चीनचे एकीकरण आणि चीनचा भव्य कायापालट या जिनपिंग यांनी मांडलेल्या दोन उद्दिष्टांनाच सर्वाधिक पसंती मिळालेली दिसून आली. त्यांनी सांगितले की, इतिहासाची पाने आता आपल्याभोवतीच फिरत असून चीनच्या एकीकरणाचे उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीत निसंदिग्धपणाने पूर्णत्वाला नेले जाणार आहे.
आपल्या भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून याविषयीचे महत्त्व आणि प्राधान्य अधोरेखित केले. जिनपिंग म्हणाले की, चीनपासून विभक्त होण्यासाठी एकवटलेल्या सर्व विभाजनवादी शक्तींच्या सक्रियतेच्या पार्श्वभूमीवरही त्यांचे सरकार तैवानमधील अलगाववाद आणि विदेशी हस्तक्षेप यांचा निपटारा करण्यासाठी सक्षम आहे. याबाबत कोणतीही कसूर सोडली जाणार नाही आणि या मार्गाच्या आड येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या विरोधाचा कठोरपणाने सामना केला जाईल. तैवानच्या स्वातंत्र्याला विरोध आणि आपली राष्ट्रीय संप्रुभता तसेच भौगोलिक अखंडत्वाच्या अनुषंगाने बोलताना त्यांनी तैवानचा मुद्दा सोडवण्यासाठी समग्र रणनीतीच्या अवलंब करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
जिनपिंग यांनी आपली ही गर्जना आणि इरादे केवळ समर्थकांपर्यंतच नव्हे तर ताइपेपर्यंत पोहोचावेत अशी व्यवस्था केली. तसेच शांततापूर्ण मार्गांचा अवलंब करतानाच गरज पडल्यास कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असल्याचे सूचित केले. चीनच्या एकंदर वैश्विक दबदब्याच्या दृष्टिकोनातून तैवानचा मुद्दा किती केंद्रीय बनला आहे, याची प्रचिती जिनपिंग यांच्या एकंदर संबोधनातून जगाला आली आहे.
असे असले तरी तैवानच्या मुद्द्याबाबत जिनपिंग हे देशांतर्गत राजकीय समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तैवानला मिळणाऱ्या कोणत्याही विदेशी मदतीला थोपवण्यासाठी चीनचे लष्कर सक्षम आहे, ही बाब जिनपिंग यांनी वारंवार जगाला सांगितली आहे. याबाबत जिनपिंग अत्यंत उतावीळ झाल्याचे दिसत आहेत. पीएलएच्या परिषदेतून दिला जाणारा संदेश एकच आहे तो म्हणजे तैवानवर येत्या काळात चीनचा दबाव वाढणार आहे. यासाठी तैवानी नागरिकांच्या उमेदीवर पाणी फेरले जाणार आहे.
जिनपिंग यांच्या भाषणानंतर तैवाननेही कठोर प्रतिक्रिया नोंदवली आहे. तैवानची भूमिका स्पष्ट असून राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी आम्ही एक पाऊलही मागे हटणार नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. दोन्हीही बाजूंसाठी युद्ध हा पर्याय असू शकत नाही, असे तैवानने म्हटले आहे. संपूर्ण तैवानी जनतेचे हे सार्वमत असल्याचे मानले जात आहे. तैवानचे पंतप्रधान सेंग चेंग यांनी म्हटले आहे की, जिनपिंग यांनी तैवानशी संघर्ष करण्यापेक्षा आणि आक्रमक भूमिका घेण्यापेक्षा देशांतर्गत पातळीवर त्यांना होणारा विरोध आणि त्यांच्या विरोधात होणारी आंदोलने यांवर लक्ष दिले पाहिजे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी बीजिंगमध्ये “शून्य कोविड नीती’ बंद करण्यासाठी आणि जिनपिंग यांना सत्तेवरून हटवण्याची मागणी करण्यासाठी जोरदार निदर्शने झालेली दिसून आली. तैवानसोबतचे चीनचे संबंध सध्या अत्यंत विकोपाला गेले आहेत. शांततापूर्ण मार्गाने तैवानचे एकीकरण करण्यासाठीचा वेळ आता हातातून निसटत चालला आहे, अशी चिनी कम्युनिस्ट पक्षाची धारणा बनत चालली आहे. दुसरीकडे, तैवानबाबत चीनच्या धोरणात काळानुरूप बदल होत चालला आहे आणि चीनच्या आक्रमक धोरणांमुळे चीन आणि तैवान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. “एक देश-दोन शासन’ ही रणनीती हॉंगकॉंग आणि मकाऊबाबत सर्वांत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे म्हणत जिनपिंग यांनी तैवानकडे अंगुलीनिर्देश केला आहे. परंतु देशभक्तांद्वारे प्रशासित केले जाणारे व्यापक स्वायत्तता असणारे क्षेत्र म्हणून राहण्यात तैवानमधील लोकांची जराही तयारी नाही. हॉंगकॉंगसारखी आपली स्थिती होता कामा नये, अशी जनभावना तैवानमध्ये सर्वत्र दिसून येते.
चिनी राष्ट्राध्यक्षांनी भलेही तैवानच्या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवल्याचे दर्शवले असले तरी सद्यस्थितीत भारतासह संपूर्ण जगभराने केवळ त्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. विशेषतः भारताने यापलीकडच्या गोष्टीही विचारात घेतल्या पाहिजेत. द ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये जिनपिंग यांचा प्रवेश होत असतानाच तेथील भव्य आकाराच्या स्क्रिनवर गलवानमध्ये झालेल्या संघर्षाचे व्हिडिओ फुटेज दाखवण्यात आले होते. त्यामुळे तैवानबाबतची चीनची भूमिका ही केवळ हिमनगाचे टोक आहे किंवा आजाराचे एक लक्षण आहे असे म्हणावे लागेल. हा आजार आहे जिनपिंग यांना जडलेल्या साम्राज्यवादी लालसेचा! त्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा ही केवळ तैवानपुरती मर्यादित नाही किंवा तैवानच्या एकीकरणाने पूर्ण होणार नाही. भारत, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्र यांबाबतची त्यांची भूमिका आणि रणनीती नजरेआड करता येणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर तैवानच्या मुद्द्यावर एक व्यापक एकजूट दर्शवणे ही काळाची गरज आहे, असे म्हणावे लागेल.