दीपावलीचे स्वागत करण्यासाठी घरोघरी पणती तेवत आहे. पणतीची मंद स्वयंप्रकाशित ज्योत घरोघरी अंधाराला छेदून जग प्रकाशित करीत आहे. तिच्या उजळणाऱ्या आणि उजळविणाऱ्या ज्योतीला सहस्र दंडवत. कारण स्वयंप्रकाशाने तळपणाऱ्या आणि जगाला उजळविणाऱ्या त्या इवल्याशा ज्योतीला दंडवत. ही ज्योत तेवत आहे ती जगाला उजळविण्यासाठी. जेथे आहे तेथे प्रकाश देणे हे पणतीचे काम.
माणसाला मात्र जग उजळविण्यासाठी प्रथम मन उजळावे लागते. कारण माणसाचे मन म्हणजे काळीकुट्ट अमावास्या. या मनात प्रतिपदेची चंद्रकोर कधीच उगवली नाही, असे म्हणावेसे वाटते. पणतीपुढे सर्व समान. गरीब असो श्रीमंत असो सर्वांना प्रकाश देतेच. मात्र माणसाबाबत असे नाही. जगात दिसणारी असमानता, अविवेक, अशांतता या साऱ्या अन्यायी गोष्टी मनाच्या अमावास्येमुळे निर्माण झालेल्या आहेत.
मनाला जोपर्यंत या तेजाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत ही तेवणारी ज्योत म्हणजे केवळ रोषणाईच होईल. म्हणून या ज्योतीचे तेज अंतर्मनावर पडले पाहिजे. माणसाचे मन म्हणजे सैतानाचे घर आहे. स्वत्व, स्वाहाःकार आणि स्वैराचार हा सैतानी मनाचा त्रिशूळ आहे. म्हणून आज जगात अन्यायालाच न्याय म्हणून मिरवले जात आहे. असत्याला सत्य म्हणून संबोधिले जात आहे. पापाचा पुण्य म्हणून गौरव केला जात आहे. अंतर्मनाला अंधारात ठेवून चाललेले जग अंधारालाच प्रकाश म्हणत अंधाराचाच आधार घेऊन वाटचाल करीत आहे. अंधारातून वाटचाल आणि अंधाराचाच आधार यातून काही प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग मिळणार नाही. म्हणूनच हे ज्योतीत तेवणारे तेज अंतर्मनाला स्पर्शून गेले पाहिजे. मनाला होणारा तेजस्पर्श म्हणजे लोखंडाला होणारा परिसस्पर्श आहे. त्या स्पर्शातूनच विचारांची सुवर्णकिरणे निर्माण होतील.
अमृतवेळा काही सारख्या लाभत नाहीत; परंतु आजचा दिवाळीचा दिवस म्हणजे अमृतयोग आहे. या अमृतयोगावर या ज्योतीतील तेजाचा स्पर्श सामाजिक मनाला होऊ दे. अनुशासनाच्या महान पर्वाने मनात आकांक्षाचे आणि उद्याच्या स्वप्नील विकासाचे भावपूर्व चित्र उमटले आहे. झोपडीतील चूलही आता दोन वेळा पेटून अन्नपूर्णा होण्याच्या आनंदात मश्गुल आहे. सावकारी कर्जाचे फास तोडले गेले आहे. वेठबिगारीच्या दास्य-शृंखला तुटून पडल्या आहेत. अनेकविध योजनांच्या सहकार्याचे हात पुढे आलेले आहेत. अशावेळी अंतर्मनाला पाहिजे तो तेजाचा स्पर्श.
अंमर्तनाला तेजस्पर्श व्हावयास पाहिजे असल्यास मन निर्मळ, निर्विकार व्हावयास हवे. आजचे सामाजिक मन म्हणजे सूड, आसूया, द्वेष यांनी भरलेले. अशा आसुरी मनाचे ज्योतीत जळून भस्म होऊ दे. शत्रूत्व आणि शत्रू भावना नष्ट होऊ देत. हे पणती, तुझ्याकडे एवढीच मागणी आहे. दीपावलीच्या लक्ष पणतींच्या तेजाने माणसाच्या अंतर्मनातील अंधःकार पूर्णपणे नाहिसा झाला तर आपण लावलेल्या या पणतींचे कार्य सफल झाले, असे म्हणता येईल. आपल्या अंतर्मनात एक छोटीशी पणती असावी. तिच्या तेजाने आपले अंतर्मन नेहमीच उजळत राहावे.