नवी दिल्ली – संसदेवर 2001 साली झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज आदरांजली वाहिली.
स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन लोकशाहीच्या या मंदिराचे रक्षण करणाऱ्या शहीदांना आदरांजली वाहताना दहशतवादाविरोधातली आपली लढाई अधिक तीव्र करायचा निश्चय आपण करणे गरजेचे असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
“2001 मध्ये या दिवशी आमच्या संसदेवर झालेला भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही. आपल्या संसदेचे रक्षण करताना आपले प्राण गमावलेल्यांचा पराक्रम आणि त्याग आमच्या स्मरणात आहे. भारत नेहमीच त्यांच्याप्रति ऋणी राहील.’असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
या भीषण हल्ल्याच्या 19 व्या स्मरणदिनी “लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनावर 2001 मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिले, त्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या हौतात्म्यासाठी देश सदैव ऋणी राहील.’ असे अमित शहा त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.
13 डिसेंबर 2001 रोजी लष्कर ए तैयबा आणि जैश ए महंमदच्या दहशतवाद्यांनी संसद भवनावर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार केला होता. प्रत्युत्तरादाखल झालेल्या भयंकर चकमकीत सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ठार मारले, यामध्ये दिल्ली पोलिसांचे 5 कर्मचारी, “सीआरपीएफ’च्या एक कर्मचारी महिला, संसद भवनाचे वॉच अँड वॉर्ड गटातील कर्मचारी आणि एक बागकाम कर्मचारी यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एक पत्रकार देखील जखमी झाले होते, ज्यांचा कालांतराने मृत्यू झाला होता.