नवी दिल्ली – कॉंग्रेसने इंडिया आघाडीमधील इतर घटक पक्षांप्रमाणेच समाजवादी पक्षाशीही (सप) जागवाटपाची प्राथमिक चर्चा केली. अशात दोन्ही पक्षांमधील वाद संपुष्टात आल्याची ग्वाही सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली. त्यामुळे त्या पक्षांमध्ये उत्तरप्रदेशातील जागावाटप सामंजस्याने होण्याची चिन्हे आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाला अंतिम रूप देण्यासाठी इंडिया आघाडी सरसावली आहे. त्या आघाडीच्या घटक पक्षांमध्ये त्यासाठी प्राथमिक पातळीवरील चर्चा प्रक्रिया सुरू झाली आहे. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वांधिक जागा आहेत. त्यामुळे तेथील चर्चेबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर त्या चर्चेलाही प्रारंभ झाला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकूल वासनिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ती चर्चा झाली.
त्यावेळी अशोक गेहलोत, सलमान खुर्शिद, मोहन प्रकाश हे कॉंग्रेस नेते आणि रामगोपाल यादव, जावेद अली खान हे सपचे नेते उपस्थित होते. चर्चा प्राथमिक स्वरूपाची असल्याने दोन्ही पक्षांकडून अधिक माहिती देण्यात आली नाही. जागांबाबतचा अंतिम निर्णय पुढील टप्प्यात होईल.
दरम्यान, मध्यप्रदेश भेटीवर असणाऱ्या अखिलेश यांनी जागावाटपावरून इंडियाच्या घटक पक्षांमध्ये कुठले अडथळे येणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून कॉंग्रेस आणि सपमधील संबंध ताणले गेले होते. मात्र, त्यावेळचा वाद भूतकाळातील बाब असल्याचे म्हणत अखिलेश यांनी आता सर्व काही आलबेल असल्याचे सूचित केले.