पुणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा मागील पाच महिने सुरू असणाऱ्या संपामुळे कोलमडलेली महामंडळाची सेवा आता सुरळीत होत आहे. सध्या पुणे विभागातून दररोज 680 बसेस धावत आहेत. तर, अद्याप बंद असणारे ग्रामीण भागातील मार्ग टप्प्याटप्प्याने सुरू होत असून, येत्या 8 दिवसांत उर्वरित मार्गांवर “लालपरी’ धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
8 नोव्हेंबरपासून विलीनीकरण, वेतनवाढ, भत्तेवाढ आदी प्रमुख मागण्यांसाठी “एसटी’च्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळे पुणे विभागातील 13 आगारांतून धावणाऱ्या बसेसना ब्रेक लागला होता. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, बारामती आदी गर्दी असणाऱ्या आगारांतून केवळ शिवनेरी आणि शिवशाहीच्या बसेस धावत होत्या. तर संप सुरू झाल्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा दौंड आगारातून “लालपरी’ (साधी) धावली होती. यानंतर आता पाच महिन्यांनंतर सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र “एसटी’चा संप आणि “पीएमपी’च्या मार्ग विस्ताराच्या पार्श्वभूमीवर “पीएमपी’ प्रशासनाने जिल्ह्यात विविध मार्गांवर सेवा सुरू केली होती. मात्र आता ही सेवा बंद होण्याची शक्यता असून, या मार्गांवर केवळ “एसटी’च्या बसेस धावणार आहेत.
विभागातील 100 टक्के कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे सेवा पूर्ववत झाली आहे. ग्रामीण भागातील उर्वरित मार्ग येत्या 8 दिवसांत सुरू करण्याचे नियोजन आहे. “पीएमपी’ची सेवा सुरू असणाऱ्या ठिकाणी “एसटी’ची समांतर सेवा सुरू ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र “एसटी’ची समांतर वाहतूक होणार नाही. – ज्ञानेश्वर रणवरे, विभाग वाहतूक नियंत्रक, पुणे विभाग