मुंबई – प्रतिक्षा तोंडवळकर सध्या स्टेट बॅंकेत सहाय्यक सरव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळतात. मात्र त्यांची इथपर्यंतची भरारी ही सर्वसामान्य कुटुंबातील कुठल्याही तरूण-तरुणीसाठी अतिशय प्रेरणादायी अशी आहे. कौटुंबिक पातळीवर आघात आणि नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी स्टेट बॅंकेच्या शाखेतच झाडलोट करण्याचे काम स्वीकारले आणि कायम संघर्ष करत, सकारात्मक दृष्टीकोन ठेवत एक-एक पायरी चढत आज त्या सहाय्यक सरव्यवस्थापक पदाला पोचल्या आहेत. बहुतेकांना यशस्वी व्यक्तीचे फक्त यश दिसते आणि त्यामागील संघर्ष, प्रयत्नांची पराकाष्ठा, कठोर मेहनत, निराशेचा काळ याची माहिती नसते. खचून न जाता, दृढपणे उभे राहून कष्ट करत राहिल्याने यशाला गवसणी घालता येतेच याचे उदाहरण म्हणजे तोंडवळकर यांची वाटचाल.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दहावीची परिक्षा देण्याच्या आधीच वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांचे लग्न लावून देण्यात आले. त्यांचे दुर्दैव म्हणजे तीनच वर्षांत त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांचे पती सदाशिव कडू हे मुंबईत स्टेट बॅंकेच्या मुख्यालयात बुक बाईंडर म्हणून काम करत होते. लग्नानंतर वर्षभरात त्यांना अपत्यप्राप्ती झाली. नवजात मुलाला कुलदैवतेच्या पायी घालून आणण्यासाठी ते कडू यांच्या कोकणातील गावी निघाले होते. मात्र इथेच आपल्या दुर्दैवाचा फेरा सुरू होणार आहे याची प्रतिक्षा यांना कल्पना नव्हती. गावाकडे जात असताना अपघात होऊन त्यामध्ये सदाशिव यांचे निधन झाले.
माहेरची परिस्थिती अतिशय हलाखीची, पदरात लहान मूल आणि नोकरी करावी तर शिक्षण नाही अशी चहूबाजूने संकटे त्यांच्यासमोर उभी राहिली होती. शेवटी संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्या स्टेट बॅंकेच्या शाखेत झाडलोट करण्याचे काम करू लागल्या. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याबरोबरच दहावी उत्तीर्ण होण्याची तयारी करू लागल्या. सकाळी विश्रांतीचे दालन, आणि शाखेचे आवार त्या झाडून काढत असत. टेबल-खुर्च्या पुसून घेत असत. सकाळी दोन तासाच्या या कामाबद्दल त्यांना महिन्याला 60-65 रुपये मिळायचे. उरलेल्या वेळात त्या मुलाचा सांभाळ आणि अन्य काही घरगुती किरकोळ कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत.
त्यांनी दहावी उत्तीर्ण होऊन पदवी संपादन केली आणि शिकणे चालूच ठेवले. त्यांचे कामाप्रती असणारी बांधिलकी आणि समर्पण लक्षात घेऊन बॅंकेने त्यांना लिपिक पदावर रुजू करून घेतले. परंतु त्यांचे यश इथेच थांबले नाही. इथून तर त्यांच्या यशाला सुरवात झाली. नंतर त्यांना पदोन्नी देऊन स्केल चार देण्यात आले. मग सीजीएम आणि शेवटी त्या एजीएम झाल्या. त्यांचा संयम, कामाला न्याय देण्याची कार्यपद्धती, कामाप्रती बांधिलकी आणि झोकून देऊन काम करण्याच्या स्वभावामुळे बॅंकेनेही त्यांची हे गुण लक्षात घेऊन त्यांनी संधी दिली.
दहावीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी मुंबईतील विक्रोळीमधील एका रात्र महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1995 मध्ये मानसशास्त्र विषयातील पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर बॅंकेत त्यांना लिपिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
1993 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा विवाह केला. त्यांचे पती प्रमोद तोंडवळकर हे बॅंकेतच मेसेंजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी पत्नीला पाठबळ दिले आणि बॅंकेच्या परिक्षांना बसण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याकाळात दोन अपत्यांचे संगोपन आणि घरातील कामांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. या सगळ्यांचे आता चीज झाले असून तोंडळवकर कटुंबियांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.