पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणला. भाजपसोबत असलेली युती तोंडात एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय देखील नितीश कुमार यांनी घेतला आहे. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व इतर भाजपविरोधी पक्षांसह सत्तास्थापनेचा दावा केला आहे. नितीश कुमार, तेजस्वी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यपालांना १६४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देण्यात आल्याची माहिती कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
नितीश कुमारांचा राजीनामा! भाजपसोबत काडीमोड…
दरम्यान, राष्ट्रीय जनता दल हा संख्याबळाच्या बाबतीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. सध्या बिहारमध्ये राजदचे 79 आमदार आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे 77 आमदार आहेत. असं असलं तरी तेजस्वी यादव यांच्या पक्षाच्या 18 आमदारांवर अपात्र ठरवले जाण्याची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्षांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप या 18 आमदारांवर होता. त्याकरता एक समितीही स्थापन करण्यात आली होती. या शिस्तपालन समितीचा अहवाल विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याकडे आला आहे. त्या अहवालात या आमदारांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अपात्रही केले जाऊ शकते. अध्यक्ष काहीतरी मोठाच निर्णय घेतील अशी चर्चा आहे.
तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू व भाजप एकत्र लढले होते. निवडणुकांमध्ये भाजपला राजदपेक्षा अधिक जागा मिळाल्या. मात्र निवडणुकांपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्रीपदाची माळ नितीश कुमार यांच्या गळ्यात पडली. मुख्यमंत्रीपद नितीश कुमारांकडे गेलं तरी मंत्रिमंडळात मात्र भाजपचा वरचष्मा राहिल्याचं पाहायला मिळालं. यातूनच जेडीयू विरुद्ध भाजप असा उघड संघर्ष पाहायला मिळत होता.
अशातच आज नितेश कुमार यांनी मंगळवारी पक्षाचे आमदार, खासदार व नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाजप जेडीयू पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा सूर उमटला. पक्षातून बाहेर पाडण्यासाठी भाजप पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांकरवी ऑफर देत असल्याचे देखील जेडीयू नेत्यांनी कुमार यांच्या कानावर घातल्याचे समजते. यानंतरच नितीश कुमार यांनी एनडीए व युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
तेजस्वी यादवांचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगणार? विधानसभा अध्यक्ष मोठा फटका देण्याच्या तयारीत…