शर्मिला जगताप
अमुक एक राजकारणी नेता गर्दीत काहीतरी “पिल्लू’ सोडून देतो. मग कार्यकर्ते नेत्याने मांडलेला मुद्दा उचलून धरतात आणि लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतात. रोज राजकारणी नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून चांगलाच गोंधळ निर्माण करीत आहेत. जनतेचा मात्र या गोंधळात अधिकच गोंधळ निर्माण होतो आहे.
कीर्तन ऐन रंगात आलेले असते. युवा आणि श्रोत्यांची पट्टी जमलेली असते. अशा वेळी एकाएकी ओरडा होतो, “गाय, गाय’ श्रोतृवृंदात घबराट होते. पळापळ, धावपळ होते. “निश्चयाचे बळ, तुका तेंचि फळ’ ही बुवांच्या तोंडाची ओळ तेथेच राहते आणि “घाबरू नका. जागेवर बसा’ असे स्पीकरवरून सांगितले जाते, असा अनुभव खेड्यापाड्यात सर्रास येतो. ऐन रंगात गायी-म्हशी आणून सोडणारे काही वल्ली असतात. स्वतः कीर्तन, भजनाला बसून गायी-म्हशी आसपास मोकाट सोडल्या जातात. त्यातील एखाद्-दुसरी कीर्तनात घुसून गोंधळ निर्माण करून सत्कार्यातही अडथळा आणते.
कीर्तनात गायी सोडणारे आहेत तसेच सभेत गाढव, बेडूक सोडणारे “राजकीय कार्यकर्ते’ असतात. हे कार्यकर्ते मोठे खटपटी असतात. विरोधकाची सभा उधळावयाची असे त्यांनी ठरविले की, संध्याकाळपासून “गाढव’ शोधण्याच्या उद्योगास लागतात आणि कसेही करून ते जमवून टाकतात. गाण्याची बैठक कशी मोडावी, नाटक कसे पाडावे, प्राध्यापकांना कसे पळवावे, याचा विचार करणारी माणसे समाजात असतात. शांत, निवांत तलाव पाहावयासही रम्य वाटतो. पण काही वेळातच माणसाच्या मनात वेगळे काही येते आणि त्यात तो एक दगड टाकतो. मग तरंग उठतात. त्या तरंगांशी मग त्याचे मन खेळू लागते. हीच वृत्ती या सर्वांमागे कुठे तरी नसावी ना?
तेव्हा वर गायी-म्हशीची गोष्ट अशासाठी सांगितली की फ्रान्स देशातील एक बातमी वाचण्यात आली. तिथे एक खिसेकापू निघाला. हातात ब्लेड घेऊन खिसे कापणारे खूप असतात पण हा मोठा युक्तिबाज होता. हा खिसेकापू म्हणा, हवे तर उचल्या म्हणा. खिशात ब्लेडऐवजी नेहमी एक उंदीर ठेवी. जाता जाता कुठे स्त्रियांचा घोळका, गर्दी दिसली की तो उंदीर जमावात सोडी. स्त्रियांच्या जमावात उंदीर सोडल्याने काय होणार याची कल्पना करा. पळापळ, ओरडाआरड, किंचाळ्या! बस्स! असे झाले की हा “हुशार’ माणूस आपले काम करी. हातातल्या मॅनिबॅगा, मोबाइल, पर्स, मौल्यवान दागिने, रोकड वगैरे लांबवायचा.
हा चोर पोलिसांनी पकडला. त्याच्या या युक्तीबद्दल पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा स्त्रियांच्या घाबरट स्वभावावरच झगझगीत प्रकाश टाकला. तो म्हणाला, “असे घडे तेव्हा स्त्रिया गर्दीत चक्क गळ्यात पडत!’ बोला, आता काही म्हणायचे आहे का? ही युक्ती पाहून मनात आले की देशातही असे काही असेल का? लगेच आठवले की आपल्याकडील चोर असे करीत नाहीत. पण राजकीय नेते ही युक्ती वापरतात. सनसनाटी घोषणा करून, प्रचंड आश्वासने देऊन मतदारांना गोंधळवून टाकतात आणि या गोंधळात लोकांची मते गळ्यात पाडून घेतात. अर्थात, गर्दीत उंदीर, बेडूक सोडून चोरी करण्याच्या युक्तीपेक्षा राजकारणांनी गोंधळ निर्माण करून सामान्य जनतेच्या मतांची चोरी करणे खूपच भयानक!