पिंपळे निलख येथील स्मशानभूमीच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये संताप
पिंपरी – मृत्यूनंतर माणूस सर्व यातनांमधून मुक्त होतो असे म्हणतात. मात्र पिंपळे निलख येथील स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याला अत्यंविधीसाठी आणणाऱ्या आप्तेष्टांनाही त्रास होत असल्याचे दिसून येते. महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्वी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर कमान होती आता ती तुटल्यामुळे काढून बाजूला टाकून दिली आहे. मृतदेह अंत्यविधीसाठी आल्यावर त्याची नोंद सुरक्षा रक्षक आणि लिपिकाच्या केबीनमध्ये होते. मात्र येथील केबीन म्हणजे एक प्रकारची टपरी आहे. पाऊस आला तरी येथील नोंद केलेली वही भिजून जाईल. याशिवाय कर्मचाऱ्यांना बसविण्यासाठी जागाही शिल्लक राहिलेली नाही. तसेच सुरक्षा रक्षकांना दादागिरी करून काही तळीरामांनी स्मशानभूमीला आपला अड्डा केला आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी याठिकाणी पथदिव्यांची सोय करण्यात आली आहे. तर सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरण केले आहे.
महापालिकेने नवीन स्मशानभूमी बांधली आहे. मात्र त्यास आवश्यक असलेली शासकीय मंजुरी घेतलेली नाही. त्यामुळे नवीन स्मानभूमीचा वापर करता येत नाही. जुन्या स्मशान भूमीत ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात तिथे सरण रचण्यासाठी लोखंडी जाळ्याच नाहीत. तसेत अंत्यविधी करीत असलेल्या ठिकाणी वरील भागातील पत्रे गंजून गेले असल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी थेट सरणावरच पडते. नवीन स्मशानभूमीला मंजुरी मिळेपर्यंत नवीन पत्रे बदलणे गरजचे आहे.
पिंपळे निलख गावाचा महापालिकेत 1986 मध्ये समावेश झाला. त्यावेळी लोकसंख्या कमी होती. आता 40 हजारांहून अधिक लोकसंख्या झाली आहे. तसेच याठिकाणी जागा असूनही इलेक्ट्रिक किंवा सीएनजी वरील शवदाहिनी नाही. त्यामुळे करोना काळात अंत्यविधी करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा
लागला होता.
दशक्रिया घाटाचीही दुरवस्था
स्मशानभूमीप्रमाणेच दशक्रिया विधी घाटाचीही दुरवस्था झाली आहे. ज्या ठिकाणी दशक्रियेसाठी महिला बसतात तिथील पत्रे उडून गेले आहेत. सध्या सकाळी आठ वाजताच कडक उन्हाची चाहूल लागते. अशावेळी सकाळी अकरा वाजेपर्यंत महिला उन्हात कशा बसणार? तसेच ज्या दिवशी पिण्याचे पाणी येते त्याच दिवशी येथील नळाला पाणी असते. इतर दिवशी स्मशानभूमीजवळील हातपंपावरून विधीसाठी पाणी आणावे लागते. जर अगोदर कोणता अंत्यविधी झाला असेल तर याठिकाणी नवीन अंत्यविधी करण्यापूर्वी पाण्याच्या बादल्या ओतून राख नदीपात्रात टाकावी लागते.
तर पालिका भवनासमोर प्रतिकात्मक अत्यंविधी
याबाबत कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी सांगितले की, येथील स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत मी प्रभागातील जनसंवाद सभेत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. येथील पत्रे बदलण्याची मागणी कली आहे. तसेच महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनाही निवेदन दिले आहे. जर प्रशासनाने 15 दिवसांत कार्यवाही केली नाही तर मग पिंपळ निलख येथील ग्रामस्थांना आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. महापालिका भवनासमोर आम्ही प्रतिकात्मक अंत्यविधी करू.