महाराष्ट्राचे पाणी आंध्रात गेले
पुणे, दि. 29 – जायकवाडीच्या नाथसागरमधून आंध्र राज्यात 1 हजार एमसीएफ पाणी दिले जात आहे. आंध्र सरकारने महाराष्ट्र शासनाला 20 हजार एकर तांदूळ पिकासाठी पाणी मागितल्यावर महाराष्ट्र सरकारने तातडीची मदत दिली आहे. अर्थातच आंध्र सरकार या पाण्याचे पैसे भरणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक
नवी दिल्ली – गृहमंत्री ब्रह्मानंद रेड्डी यांनी येत्या मान्सूननंतर लगेच गुजरात विधान सभेच्या निवडणुका घेण्यात येतील असे म्हटले असले तरी 23 एप्रिलपर्यंत याबाबत घोषणा न झाल्यास विद्यार्थी गुजरातधील कॉंग्रेस खासदारांविरुद्ध प्रत्यक्ष कृतीस प्रारंभ करतील, असा इशारा विद्यार्थी नेत्यांनी दिला आहे. गुजरातमधील राष्ट्रपती राजवट लवकर संपवावी म्हणून सं. कॉंग्रेसने तेथे सुरू केलेल्या कायदेभंगाच्या चळवळीत आज 150 जणांना अटक झाली. 23 एप्रिलपर्यंत निवडणुका होतील असे पाहावे, अशी मागणी होत आहे.
दृष्टतम कॅन्सरवर प्रभावी औषध
मॉस्को – कॅन्सरच्या जंतूमध्ये अत्यंत दुर्धर असा “कोरियो-कार्सिनोमा’ जातीचा कॅन्सर समजला जातो. त्यावर रशियन शास्त्रज्ञ डॉ. सर्जीयेव्ह यांनी एक प्रभावी गोळी तयार करून इलाज शोधून काढला आहे. ते म्हणतात, या जातीचा कॅन्सर जर बरा होऊ शकला तर सर्व प्रकारचे कॅन्सर रोग बरे होऊ शकतील.
तो हसता हसता पुरेवाट होऊन गेला!
किंग्ज लिन, इंग्लंड – अलेक्झांडर मिशेल हा हर्षवायू होऊन हसता हसता मृत्यू पावला. त्याची बायको म्हणाली, आम्ही टीव्ही पाहत असता त्यातील विनोदी कथेमुळे तो बेफाट हसला व त्यामुळे त्यास हृदयविकाराचा झटका आला. टीव्हीवर एक खोटी मारामारी दाखविली जात होती. बीबीसीने त्याच्या मृत्यूबाबत दुःख प्रगट केले तेव्हा मिसेस मिशेल म्हणाली, छे, छे उलट माझ्या नवऱ्याचे शेवटचे क्षण आनंदात गेले. मला अद्यापही माझा नवरा हसतो आहे, असा भास होतो, ही आठवण सुखकारक नाही काय?