लाखणगांव- परतीच्या पावसाने बटाटा पिकाला तडाखा दिला आहे, त्यामुळे बटाटा पीक सडल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल खात्याने याबाबत पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
देवगांव, लाखणगांव, काठापूर, जारकरवाडी, नागापूर, रांजणी, थोरांदळे, वळती, पारगाव, जाधववाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बटाट्याचे पीक घेतले जाते. मागील पंधरा दिवस माघारी मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने बटाट्याचे पीक सडले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 18 ते 20 रुपये प्रति किलो दराने बटाट्याचे वाण खरेदी करून शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केली होती. बटाटा वाणे, लागवड, खते, औषधे, मजुरी या सर्वांचा विचार करता एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च शेतकऱ्यांनी केला आहे; परंतु मागील पंधरा दिवसांपासून या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे, त्यामुळे फुलोऱ्यात आलेले बटाट्याचे पीक सडले आहे. बटाटा काढणीसाठी एक ते दीड महिन्याचा अवकाश आहे. मात्र, आता हे पीक पूर्णपणे हातातून गेले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागापूर येथील शेतकरी नवनाथ पोखरकर आणि वामन पवार यांनी केली आहे.