मुंबई – जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर उत्पादन करणार असलेली कंपनी आता भारतामध्ये आपला उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली करीत असल्याचे वृत्त आहे.
मोटारीसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टर हा अपरिहार्य भाग असतो. याबाबत परावलंबी राहून चालणार नाही म्हणून केंद्र सरकारने 76 हजार कोटी रुपयांची उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू केली आहे. इंटेल कंपनीने या योजनेचे स्वागत केले असून भारतामध्ये एक प्रकल्प सुरू करण्याच्या शक्यतेवर विचार करीत असल्याचे सांगितले आहे.
कंपनीचे सर्वात आधुनिक उत्पादन असलेले इंटेल 18 ए उत्पादन कंपनी भारतात करण्याची शक्यता आहे. काही माध्यामानी इंटेल कंपनीकडे यावर प्रतिक्रिया मागितली. मात्र इंटेल कंपनीने होकार किंवा नकार दिला नाही. मात्र भारत सरकारची योजना फारच उपयोगी आहे असे मत इंटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अगोदरच व्यक्त केले असून तिच्या या वक्तव्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागत केले आहे.
त्यांनी इंटेल वेलकम टू इंडिया असे ट्विट देखील केले आहे. यावरून इंटेल कंपनी भारतामध्ये सक्रीय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. करोनाच्या काळामध्ये जागतिक पुरवठासाखळी बिघडल्यामुळे भारतामध्ये सेमीकंडक्टरची प्रचंड तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन निर्मितीबरोबरच इतर घरगुती उपकरणाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
सेमीकंडक्टर चिप निर्माण करणाऱ्या देशांनी कंडक्टरची साठेबाजी केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारताच्या विविध क्षेत्रातील उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यासाठी या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे.
अनुदानासाठी कंपन्या एक जानेवारीपासून आपले प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणार असून त्यामध्ये इंटेलचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.