मुंबई – राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत.
अशावेळी साडे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतच्या सुनावण्यांना हजर राहिले नाहीत म्हणून 700 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक एसटी कर्मचारी आगारात जात कामावर रुजू करुन घेण्याची विनंती करत आहेत. मात्र, मध्यवर्ती कार्यालयाने याबाबत सूचना केली नसल्याचे सांगत आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करुन घेण्यास नकार दिला आहे.
महामंडळाच्या शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी हे कर्मचारी कामावर रुजू करुन घेण्याची मागणी करत आहेत. मात्र, आता आगारप्रमुखांकडून त्यांना कामावर रुजू करुन घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांचा परतीचा मार्ग खुंटल्याचे बोलले जाते आहे.