संगमनेर (प्रतिनिधी) – निसर्ग वादळाने पिकांबरोबरच पॉलिहाऊस आणि शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहेत. नुकसान भरपाई देण्याचा निर्णय करताना शेडनेट आणि पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांनाही शासनाने दिलासा देण्याचा विचार गांभिर्याने करावा. यासाठी तहसिल आणि कृषि विभागाने वडगाव मावळचा पॅटर्न राबवून पंचनाम्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याची सुचना माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली.
निसर्ग वादळाच्या संकटामुळे या पॉलिहाऊस आणि शेडनेटचे संपुर्ण स्ट्रक्चरचेही नुकसान झाले आहे. यासाठी वापरण्यात येणारा कागदही वादळ आणि पावसाने फाटल्याने संपुर्ण शेडनेट आणि पॉलिहाऊस नव्याने उभे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या शेतकऱ्यांना आता पॉलिहाऊस आणि शेडनेटमध्ये उत्पादन घेणेही शक्य होणार नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी बॅंकांची कर्ज काढुन हे पॉलिहाऊस आणि शेडनेट उभे केले आहेत. या नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आ.विखे पाटील यांनी निमगावजाळी येथेच सर्व तरुण शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी नुकसान झालेल्या पॉलिहाऊस आणि शेडनेटच्या झालेल्या नुकसानीची माहीती दिली. तहसिलदार अमोल निकम यांनी नुकसानीचे पंचनामे सुरु असुन, मदतीबाबतचे अहवाल पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. वडगाव मावळ तालुक्यात पॉलिहाऊस आणि शेडनेट मोठ्या प्रमाणात आहेत. वादळी वाऱ्याने तिथेही मोठे नुकसान झाले आहे. तेथील प्रशासकीय यंत्रनेने या झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करुन अहवाल शासनास सादर केला आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातही शेडनेट आणि पॉलिहाऊसच्या नुकसानीचे पंचनामे महसुल आणि कृषि विभागाने केले पाहीजेत अशी सुचना करुन आ.विखे पाटील म्हणाले की, झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या प्रती संबधित शेतकऱ्यांना दिल्या तर बॅंकांकडुन कर्ज घेतलेल्या शेतक-यांना सामोपचार कर्ज योजनेतून कर्ज फेडण्यास त्याची मदत होईल.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या ऍड. रोहीणी निघुते, माजी उपसभापती मच्छिंद्र थेटे, सरपंच अमोल जोंधळे, बाळासाहेब डेंगळे, किरण आरगडे, तालुका कृषि अधिकारी शेंडगे, पर्यवेक्षक प्रशांत वाकचौरे यांच्यासह तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.