मुळामाईवर पांढऱ्या फेसाची चादर : रसायनांमुळे नदी मरणासन्न
पुणे – पाण्यावर दूरवर पसरलेल्या पांढऱ्या फेसाची चादर पाहून अनेकांना नदीवर बर्फ साचला आहे, की काय असा भास होतो. मात्र, दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये आढणाऱ्या रासायनिक घटकांच्या प्रभावामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळेच शहरातील नद्यांमध्ये रासायनिक घटकांचा प्रादुर्भाव वाढत असून, अनेक ठिकाणी नदीमध्ये अशा प्रकारचा बर्फसदृश फेस निर्माण होत आहे. खडकी येथील मुळा नदीतदेखील रविवारी हेच चित्र पाहायला मिळाले.
नागरिकांकडून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या टूथपेस्ट, शॅम्पू, साबण, डिटर्जंट पावडर विविध साबण अशा विविध वस्तूंचा भरमसाठ वापर केला जातो. या वस्तूंमध्ये असलेले रासायनिक घटक पाण्याच्या माध्यमातून सांडपाणी वाहिनीद्वारे थेट नदीमध्ये मिसळते. त्यामुळेच नदीतील पाण्यामध्ये या रासायनिक घटकांचा प्रभाव वाढत असून, परिणामी पाण्याचा दर्जा गंभीररित्या खालावत असल्याची नोंद नदीविषयक अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी नोंदविली आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी घातक, दुर्गंधीयुक्त असा पांढरा फेस निर्माण होत असल्याचे पाहायला मिळते.
याबाबत नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या जीवितनदी संस्थेच्या कार्यकर्त्या शैलजा देशपांडे म्हणाल्या, “घराघरांमधून निघणाऱ्या सांडपाण्यात रासायनिक घटकांचे प्रमाण जास्त असते. यामध्ये सल्फ्रेट आणि फॉस्फेट या रासायनिक घटकांचा समावेश सर्वाधिक असतो. दुर्दैवाने आपल्याकडील एकाही मैलापाणी शुद्धीकरण केंद्रात रासायनिक घटकांवर प्रक्रिया करण्याची क्षमताच नाहीये त्यामुळे हे पाणी जशास तसे नदीमध्ये मिसळते. परिणामी नदी प्रदूषित होत आहे. दैनंदिन जीवनात रासायनिक घटकांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकांनी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी कठोर नियम आणि दंडात्मक कारवाईची गरज आहे.’
“नदीतील प्रदूषणाचे मुख्य कारण हे सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण हेच आहे. मात्र, खडकी येथील पाण्यात काही रासायनिक घटक सोडण्यात आले आहेत का? याचा तपास करावा लागेल. त्याठिकाणचे पाण्याचे नमुने तपासल्यानंतरच हा फेस रासायनिक घटकांमुळे आहे आणि असेल तर ती कोणती याचे स्पष्टीकरण मिळेल.’
– मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका