पुणे – यावर्षी 1972 नंतरचा सर्वांत मोठा दुष्काळ पडला आहे. खेड तालुक्यात भीषण पाणी टंचाईचे संकट आले आहे. तालुक्यातील धरणे आटली असल्याने अजूनही पावसाची शक्यता नसल्याने आणि मान्सून लांबल्याने तालुक्यातील परिस्थिती भीषण होणार आहे. यावर उपाययोजना करणे हाताबाहेर आहे. मात्र, यावर्षीचा दुष्काळ लक्षात घेता पुढे पाण्याचे नियोजन काटकसरीने करण्याची गरज आहे. जानेवारीपासून टंचाईग्रस्त गावांचे टॅंकर मागणी प्रस्ताव येतात त्यामुळे या गावांना कायमस्वरूपी पाणी योजना देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी नियोजनबद्ध विकास योजना राबविणे काळाची गरज आहे.
गतवर्षी जुलै महिन्यानंतर तालुक्यात पाहिजे तेवढा पाऊस पडला नाही. तालुक्याच्या अनेक भागात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई होती. नशिबाने कळमोडी, चासकमान, भामा आसखेड धरणे भरली मात्र या धरणातील पाण्याचे नियोजन व्यवस्थित न केल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीसंकट कोसळले आहे. सप्टेंबरनंतर पावसाने दडी मारल्याने उपलब्ध पाण्याचे स्त्रोत जानेवारीतच प्रखर उन्हामुळे आटून गेले. विहिरी, तळी, पाझर तलाव, धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत गेला. तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागातील अनेक गावे आणि त्यांच्या वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या सुरू झाली. या भागात पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत उपलब्ध नसल्याने दरवर्षी उन्हाळा आला की पिण्याच्या पाण्यासाठी वाड्या-वस्त्यांमधील नागरिकांना उन्हात वणवण भटकंती करावी लागते. हंडाभर पाणी मिळण्यासाठी तासन्तास पाण्याच्या झऱ्याजवळ बसावे लागत आहे. यासाठी काम धंदा सोडून द्यावा लागत असल्याने थेंबभर पाण्यासाठी दिवस वाया
जात आहे.
खेड तालुक्यात तीन धरणे आहेत. या तीनही धरणात दरवर्षी मुबलक पाणीसाठा होत असतो. मात्र या पाण्यावर तालुक्यातील नागरिकांचा जणू अधिकारच नसल्याची जाणीव होत आहे. उपलब्ध पाणी त्यांना मिळण्याऐवजी ते दुसरीकडे सोडण्यात येते. “धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती आजही तालुक्यात आहे. मग धरणे बांधून उपयोग काय? ती कोणासाठी बांधली? खेडच्या राज्यकर्त्यांनी भामा आसखेड, चास कमान आणि कळमोडी धरणांवर राजकारण केले. सत्ता मिळवल्या मात्र, त्यांना तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करायला वेळ मिळाला नाही. शासनाच्या मोठ्या योजना असताना राजकारणापायी येथील जनतेची ससेहोलपट झाली आहे. जसे राज्यकर्त्यांनी लक्ष दिले नाही तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी देखील दिले नाही. यामुळे त्यांच्याही नाकर्तेपणामुळे मोठ्या योजना कार्यान्वित करता आल्या नाहीत. याचा मोठा त्रास आता खेड तालुक्यातील पूर्व भागातील नागरिकांना सोसावा लागत आहे. हीच परिस्थिती तालुक्याच्या पश्चिम भागातील आहे. तालुक्यात पाण्याचे मोठे स्त्रोत असलेली तीन धरणे असताना तालुक्यातील निम्म्यापेक्षा जास्त भाग तहानलेला आहे.
पशुधन असलेला खेड तालुका गणला जातो. मात्र, पाणीटंचाई मुळे गोठे ओस पडू लागले आहेत. गोठ्यातील आणि जंगलातील पशुपक्षी यांची तहान भागत नाही. दरवर्षीच पाणीटंचाईमुळे तालुक्यातील पशुधन घटले असून जंगलातील प्राणी दुर्मिळ झाले आहेत. शासनाकडून जलस्त्रोत निर्माण करण्याची अलीकडील काळात प्रयत्न झाले मात्र, जलसाठा होत नाही. कागदावरची कामे होत असून प्रत्यक्ष लाभ मात्र, घेत येत नाही अशी कामे केली गेली आहेत. तालुक्यातील धरणावरून टंचाईग्रस्त गावांना त्यांच्या वाड्यावस्त्यांना थेट पाणीपुरवठा करणाऱ्या योजना राबविण्यासाठी शासनकर्ते आणि राज्यकर्ते यांनी आग्रह धरला तर तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट कायमचे दूर होईल. यासाठी तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांनी पक्ष व आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील तीनही धरणातून उपसा जलसिंचन योजना राबवून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यात यश येईल.