राहुल गोखले
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपविरोधकांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे वेध लागले आहेत, असेच म्हटले पाहिजे.
ममता बॅनर्जी यांना भाजपविरोधकांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे वेध लागल्यामुळेच त्यांनी एकीकडे भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली असणारी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) अस्तित्वातच नाही, असा दावा केला आहे. काही काळापूर्वी ममता यांनी दिल्लीत अशाच गाठीभेटी घेतल्या होत्या. त्या सोनिया आणि राहुल गांधी यांना आवर्जून भेटल्या होत्या.
तथापि त्यानंतर त्या कॉंग्रेसची सातत्याने फटकून वागत आहेत आणि भाजपपेक्षाही कॉंग्रेसला लक्ष्य करण्यात त्यांचा उत्साह अधिक दिसत आहे. आताही त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाच्या सातत्यहीनतेला लक्ष्य केले आहे. “बराचसा काळ तुम्ही परदेशात जाऊन बसू शकत नाही’ हा टोला राहुल गांधी यांना उद्देशून होता हे लपलेले नाही. तेव्हा कॉंग्रेसला बाहेर ठेवून ममता भाजपविरोधकांची मोट बांधू इच्छितात, असे दिसते.
किंबहुना सोनिया आणि राहुल यांच्यापेक्षाही आपले नेतृत्व हे राष्ट्रीय स्तरावर अधिक उठून दिसावे यासाठी त्यांचा सध्याचा अट्टहास दिसतो. ममता यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केल्याची ही काही पहिली वेळ नव्हे. महिनाभरापूर्वीच ममता यांनी कॉंग्रेस राजकारणाकडे गांभीर्याने पाहात नाही असा ठपका ठेवला होता. त्याच आपल्या मताची री ओढत ममता यांनी पुन्हा कॉंग्रेसवर शरसंधान केले आहे.
पण कॉंग्रेसच्या दृष्टीने चिंतेची बाब ही की, ममता यांचे कॉंग्रेसला लक्ष्य करणे हे केवळ शब्दांपुरते मर्यादित नाही तर काही ठिकाणी तृणमूलने पद्धतशीरपणे कॉंग्रेसला कमकुवत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यातही पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत केल्याने ममता यांचा दबदबा अद्यापि कायम आहे. तृणमूलकडून निरनिराळ्या राज्यांत आपल्याला लक्ष्य केले जात असताना आणि आपल्या पक्षात फूट पाडली जात असताना कॉंग्रेसकडून कोणताही प्रतिकार अथवा नाराजी व्यक्त होताना दिसत नाही. उलटपक्षी कॉंग्रेस नेतृत्वाच्या या उदासीनतेमुळे बहुधा कॉंग्रेसमधील असंतुष्ट तृणमूलची वाट धरत असावेत.
गोव्याच्या राजकारणात तृणमूलला प्रवेश करायचा आहे आणि तेथे भाजपला पराभूत करायचे आहे. अर्थात गोव्यात तृणमूल संघटन असणे शक्य नाही. तेव्हा कॉंग्रेस सरकारचे मुख्यमंत्री राहिलेले लुईझिनो फालेरो यांना आपल्या गळाला लावण्यात तृणमूलला यश आले. फालेरो यांना तृणमूलने आपल्या पक्षातर्फे राज्यसभेची उमेदवारीही घोषित केली आहे. या सगळ्या घडामोडी घडत असताना कॉंग्रेसकडून कोणतीही हालचाल झालेली दिसत नाही.
मेघालयात तर तृणमूल कॉंग्रेसने कॉंग्रेसला धोबीपछाडच दिला आहे. तेथेही माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह कॉंग्रेसच्या 17 पैकी 11 आमदारांनी पक्षांतर करून तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का आहे हे तर खरेच; मात्र त्याहून धक्कादायक म्हणजे कॉंग्रेसची निष्क्रियता. एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा बनवताना राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून कोणतीही हालचाल होत नाही हे केवळ आश्चर्यकारक आहे असे नाही, तर चिंताजनक आहे.
ममता यांनी तृणमूल कॉंग्रेसला राष्ट्रीय ओनामा देण्याचा चंगच बांधला आहे हे अन्य काही पक्षांतरांवरून देखील सिद्ध होते. कीर्ती आझाद आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अशोक तन्वर दोघांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत तृणमूलमध्ये प्रवेश केला तर नितीश कुमार यांच्याशी मतभेद झालेले संयुक्त जनता दलाचे पवन वर्मा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. यापूर्वी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी हेही कॉंग्रेस सोडून तृणमूलवासी झाले होतेच.
तेव्हा एकीकडे भाजपला आव्हान देण्याची भाषा करतानाच ममता मात्र कॉंग्रेसलाच तडाखा देत आहेत. याचा हेतू स्पष्ट आहे आणि तो म्हणजे भाजपविरोधकांचे नेतृत्व दुर्बल कॉंग्रेसकडे न राहता आपल्याकडे यावे हा. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट ममता यांनी घेतली; पण कॉंग्रेस नेत्यांना भेटणे त्यांनी टाळले. यातूनही ममता यांनी आपला इरादा पुरेसा स्पष्ट केला आहे.
अर्थात, येथे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की, कॉंग्रेसला दुर्बल करून स्वतः सबळ होण्याचे जे डावपेच ममता बॅनर्जी रचत आहेत त्यामध्ये काही संभाव्य धोके आहेत. एक म्हणजे कॉंग्रेस अशा स्थितीत आहे की, तिचे दुर्बल होणे यामुळे भाजपला फारसा लाभही नाही किंवा तोटाही नाही. मात्र, कॉंग्रेसला दुर्बल करून भाजपविरोधकांच्या एकजुटीला मात्र छेद जाण्याचा संभव आहे. कॉंग्रेस हा कितीही दुर्बल पक्ष असला तरीही काही राज्यांत त्या पक्षाची सरकारे आहेत आणि अनेक राज्यांत त्या पक्षाचे लक्षणीय अस्तित्व आहे.
राष्ट्रीय राजकारणावर कॉंग्रेसचा प्रभाव कमी होत असताना साहजिकच कॉंग्रेसला खिंडार पाडून ममता काही नेत्यांची आयात अवश्य आपल्या पक्षात करू शकतील आणि कॉंग्रेसला आणखी तोंडघशी पाडू शकतील. त्यामुळे तृणमूलला कदाचित राष्ट्रीय राजकारणात प्रकाशझोत मिळेल. मात्र ज्या नेत्यांची आयात ममता आपल्या पक्षात करीत आहेत त्यापैकी किती जणांचा भक्कम जनाधार आहे आणि त्यापैकी किती जण हे निवडणुकीत काही उमेदवार निवडून आणू शकतात हा खरा प्रश्न आहे. तेव्हा या फोडाफोडीने फार तर कॉंग्रेसच्या मनोधैर्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो;
मात्र त्याने तृणमूलला राजकीय लाभ किती होईल, हा प्रश्न अप्रस्तुत नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल बाजी मारू शकला याचे एक कारण जसे ममता यांचे नेतृत्व हे होते तद्वत तृणमूलचे संघटन हेही होते. ज्या नेत्यांच्या आयातीच्या भरवशावर ममता आपली राष्ट्रव्यापी प्रतिमा निर्माण करू पाहात आहेत ते तृणमूलचे देशव्यापी संघटन उभे करण्यात किती साह्यभूत ठरतील यावरही प्रश्नचिन्ह आहे. संघटन नसेल तर नेत्यांच्या आयातीतून फारसा लाभ होत नाही हा पूर्वानुभव आहे. नेत्यांच्या आयातीतून तत्कालिक वातावरणनिर्मिती होऊ शकेल;
पण त्यामुळे भाजपला आव्हान देता येईल असे नाही. तेव्हा 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला प्रबळ लढत द्यायची तर ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेसशी फटकून वागून चालणार नाही आणि कॉंग्रेसने देखील लगेच तृणमूलवर पलटवार करणे संयुक्तिक ठरणार नाही. भाजपविरोधकांमधील ही दरी भाजपच्या पथ्यावरच पडेल यात शंका नाही. महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही; पण सुज्ञतेची जोड नसेल तर त्यांची परिणती मुखभंग होण्यात होत असतो.