स्वप्निल श्रोत्री
आज 4 डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो; त्यानिमित्त भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाचा घेतलेला हा आढावा…
कोणत्याही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सशस्त्र बल आवश्यक असते. राष्ट्राची जितकी मोठी लष्करी ताकद, तितका जास्त प्रभाव हा त्या राष्ट्राच्या आजूबाजूच्या प्रदेशावर पडत असतो. म्हणून जागतिक राजकारणात स्वतःसाठी महत्त्वाचे स्थान निर्माण करू इच्छित असणारी राष्ट्रे आपले लष्करी सामर्थ्य वाढविताना दिसतात.
लष्कराचे भूदल (आर्मी), नौदल (नेव्ही) आणि वायूदल (एअर फोर्स) असे तीन प्रमुख प्रकारात वर्गीकरण केले जाते. जगातील प्रत्येक राष्ट्राकडे सेनादलाचे वरील तीनही प्रकार असतीलच असे नाही. जी राष्ट्रे भूवेष्टित आहेत (ज्याच्या सर्व सीमा या जमिनीने वेढल्या गेल्या आहेत) त्यांच्याकडे समुद्रीमार्ग नसतो; त्यामुळे त्या राष्ट्राला आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आजूबाजूच्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते.
भारत हे सागरी संपत्तीच्या बाबतीत भाग्यवान राष्ट्र आहे. भारताला 7,517 किमी लांबीचा एकूण सागरी किनारा लाभला असून भारताच्या सागरी हद्दीत विपुल साधनसंपत्ती आहे. एवढ्या मोठ्या साधनसंपत्तीचे आणि भारतीय सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय नौदल गेल्या 400 वर्षांपासून पार पाडत आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
आधुनिक भारतीय नौदलाच्या निर्मितीची सुरुवात ही भारतातील ब्रिटिशांच्या आगमनाबरोबर सुरू झाली, असे मानतात. ब्रिटिश आणि फ्रेंच हे त्याकाळातील लष्करी महासत्ता होते.
जमिनीवरील लढाई फ्रेंच
सर्वोच्च होते तर समुद्री लढाईत ब्रिटिश वरचढ होते; त्यामुळे भारतासह जगभरातील आपल्या वसाहतींच्या रक्षणासाठी ब्रिटिशांनी आपल्या वसाहतीत नौदलाची निर्मिती केली. इ. स. 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने अधिकृत भारतीय नौदलाची निर्मिती केली.
इ. स. 1685 मध्ये त्याला “बॉम्बे मरीन’ असे नाव देण्यात आले. 8 सप्टेंबर 1930 रोजी ब्रिटिशांनी भारतीय नौदल कायदा संमत करून “रॉयल इंडियन नेव्ही’ची निर्मिती केली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने “रॉयल’ हा शब्द काढून “इंडियन नेव्ही’ असे नामकरण केले.
इंडियन नेव्ही अर्थात भारतीय नौदल जगातील सर्वश्रेष्ठ नौदलांपैकी एक असून अनेक मोठे विक्रम भारतीय नौदलाच्या नावावर आहेत. सध्या भारतीय नौदलात 65 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांसह 55 हजार राखीव कर्मचारी आपली सेवा देत आहेत.
भारताच्या रक्षणासाठी भारतीय नौदलाकडे 150 लष्करी जहाजे आणि 300 लढाऊ विमानांसह हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या, विनाशिका अशी भक्कम शस्त्रसामग्री आहे. “शं नो वरुण:’ हे भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, जपान, ब्रिटन, फ्रान्स अशा जगातील अनेक बड्या राष्ट्रांबरोबर भारतीय नौदलाचे लष्करी सराव होत असतात.
ऑपरेशन ट्रायडंट
भारतीय नौसेनेकडे युद्धासह विविध छोट्या-मोठ्या ऑपरेशन आणि कारवाईचा बक्कळ अनुभव आहे. अफूच्या पहिल्या युद्धापासून ते दोन्ही महायुद्धे आणि आजच्या काळात सांगायचे झाले तर, 2019 मधील अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हार्मुझच्या सामुद्रधुनीतील भारतीय नौदलाची गस्त आणि करोना काळातील ऑपरेशन समुद्रसेतू अंतर्गत परदेशातील भारतीयांना मायदेशी परत आणण्यापर्यंत अशा अनेक कारवायांमध्ये भारतीय नौदलाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
इ. स. 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी पाकिस्तानने भारतावर लष्करी हल्ला केल्यानंतर 3 डिसेंबर रोजी भारताने पाकविरोधात अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. 4 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाने स्क्वाड्रन कमांडर बबरू भान यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भारताची समुद्री हद्द ओलांडून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत प्रवेश केला. तत्कालीन पश्चिम पाकिस्तानच्या कराचीस्थित पाकिस्तानी नौदल तळावर हल्ला करून परत येणेही भारतीय नौदलाची योजना होती.
सदर हल्ल्याची तयारी किंवा हल्ल्याचा मास्टर प्लॅन हा दोन महिन्यांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व ऍडमिरल एस. एम. नंदा यांनी बनविला होता. स्क्वाड्रन कमांडर बबरू भान यादव हे आयएनएस निर्घटमध्ये बसून हल्ल्याचे नेतृत्व करीत होते. कराचीपासून 150 किमी अंतरावरून भारतीय नौदलाच्या ताफ्याने पाकच्या नौदल तळावर जबरदस्त रॉकेट हल्ला करून पाकिस्तानच्या पीएनएस खैबर, पीएनएस चॅलेंजर आणि पीएनएस मुहाफिज या लष्करी जहाजांना नष्ट केले.
भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराचीस्थित बंदरावर केलेला रॉकेट हल्ला इतका भीषण होता की, पाकिस्तानच्या वरील मोठ्या लष्करी जहाजांबरोबर मोठ्या प्रमाणावर युद्धासाठी गोळा केलेली शस्त्रसामग्री, दारूगोळा आणि इंधन नष्ट झाले. भारतीय नौदलाच्या हल्ल्याने पाकच्या नौदल तळाला लागलेली आग इतकी भीषण होती की, ती विझवण्यासाठी पाकिस्तानला 7 दिवसांचा वेळ लागला.
भारतीय नौदलाचे तत्कालीन ऍडमिरल एस. एम. नंदा यांच्या नेतृत्वाखाली “ऑपरेशन ट्रायडंट’ अंतर्गत भारतीय नौदलाने केलेल्या गौरवास्पद कामगिरीच्या सन्मानार्थ दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस “भारतीय नौदल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
काळानुरूप सुरक्षा यंत्रणांमध्ये जे बदल होणे आवश्यक आहेत त्या बदलांमधून भारतीय नौदल आज जात आहे. भारतीय नौदलात अत्याधुनिक जहाजे आणि पाणबुड्यांचा समावेश करण्यात येत असून काहींची निर्मिती सुरू आहे. आयएनएस अरिहंत ही भारतीय नौदलाची अत्याधुनिक पाणबुडी असून ती अण्वस्त्रांनी कायम सज्ज असते. देशाच्या संरक्षणात भारतीय नौदलाला विशेष स्थान असून त्याच्या गौरवप्रीत्यर्थ आजचा दिवस साजरा केला जातो.