- खराडी-चंदननगर परिसराला पाणी कधी मिळणार?
- प्रकल्पाची सुरुवात माझ्या कार्यकाळात झाली : बापूसाहेब पठारे
विश्रांतवाडी (पुणे) – “भामा-आसखेड प्रकल्पाची सुरुवात माझ्या कार्यकाळात झाली आहे. विद्यमान आमदारांना निवडून येऊन जेमतेम वर्षच झाले आहे. त्यातच करोनामुळे आठ महिने कामकाज ठप्प होते. मग आमदारांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यास कधी पाठपुरावा केला? न केलेल्या कामाचे फक्त श्रेय घेण्यासाठी आमदारांची धडपड सुरू आहे,’ असा आरोप वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांनी केला आहे. शिवाय “खराडी-चंदननगरला भामा-आसखेडचे पाणी कधी मिळणार, याबद्दल आमदार स्पष्टपणे का सांगत नाहीत?,’ असा सवालही पठारे यांनी उपस्थित केला. प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये सुरू असलेल्या वादात पठारे यांनी देखील उडी घेतली आहे.
पालिका स्थायी समिती अध्यक्ष असताना खराडी-चंदननगरसह वडगावशेरी मतदारसंघातील विविध भागांतील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी बजेटमध्ये मोठी तरतूद केली. 2009 मध्ये निर्माण झालेल्या वडगावशेरी मतदारसंघाचा प्रथम आमदार होण्याचा मान जनतेने दिला. पाणीप्रश्नाबाबत शासन, महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालिन आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रकल्पाला आवश्यक मंजुरी मिळण्यासाठी पत्रव्यवहार केले.
सर्व मंजुरी मिळाल्यानंतर विमाननगर येथे प्रकल्पाचा शुभारंभ केल्याचे पठारे यांनी सांगितले. याबाबत तारखांसह सर्व पत्रे आपल्याकडे आहेत. यावेळी विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी पक्षातदेखील नव्हते, ते अन्य पक्षात होते. त्यानंतरदेखील ते निवडून आल्यानंतर एकाच वर्षात प्रकल्प मार्गी लावल्याचे सांगत श्रेय घेत आहेत. हे पाणी संपूर्ण मतदारसंघाला मिळाले पाहिजे. त्यांच्यासाठीच प्रकल्प आहे, मात्र, विद्यमान आमदारांनी मतदारसंघाला पाणी वाटपाचे नियोजन करताना खराडी-चंदननगरला कुठल्या टप्प्यात पाणी देणार, हे सांगितले नाही. त्यामुळे या भागाला पाणी मिळणार की नाही, हे त्यांनी सांगावे.
अन्यथा आम्ही महापालिकेकडे पाठपुरावा करणार आहोत. याशिवाय लोहगावला तीन दिवसांतून एकदाच का पाणी वितरण केले जाणार, निदान आता भामा-आसखेडचे पाणी आल्यानंतर तरी लोहगावला दरररोज मुबलक पाणी मिळाले पाहिजे. जर टाकी नसेल, तरी सतत पंप सुरू ठेवून लोहगावला दररोज पाणी द्यावे,’ अशी मागणी बापूसाहेब पठारे यांनी केली आहे.
प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी पाठपुरावा केला : आमदार टिंगरे
“भामा-आसखेड हा प्रकल्प मीच केला, असे केव्हाही म्हणालो नाही. या प्रकल्पाची सुरुवात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच झाली आहे. याचे भूमिपूजन 2013 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन महापौर स्व. चंचला कोद्रे यांच्या हस्ते झाले होते. मात्र, 2014 ला सत्तांतर झाल्यानंतर कामाचा वेग मंदावला होता. मागील साडेतीन वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याच हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत समावेश असलेल्या सर्व परिसराला टप्प्याटप्प्याने पाणी मिळणार आहे. लोहगावमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले वाहिन्यांचे नेटवर्क डेव्हलप झाल्यावर दररोज व मुबलक पाणी मिळणार आहे, असे मत विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केले आहे.