नवी दिल्ली: पश्चीम बंगालचे राजकीय वातावरण प्रचंड दुषीत असून येथे होत असलेल्या राजकीय हिंसाचाराचे आश्चर्य वाटते कारण कधी काळी राजकीय हिंसाचाराचा बळी ठरलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात येथे अशा प्रकारच्या घटना घडतात हे खरच आश्चर्यकारक आहे असे विधान माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केले आहे.
यावेळी पश्चीम बंगाल येथील राजकीय हिंसाचारामध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांसाठी आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना सुषमा स्वराज यांनी हे विधान केले. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, एखादी व्यक्ती सत्ता मिळवण्यासाठी इतकी कृर कशी होवू शकते आणि एखाद्याचा जीव घेऊ शकते हे समजण्या पलिकडचे आहे.
या राजकीय हत्याकांडांमध्ये ज्यांची हत्या झाली त्यांचा कोणताही दोष नव्हता केवळ एखाद्या पक्षाची विचारधारा स्विकारली म्हणून हत्या करणे हे केवळ क्रूरपणाचे लक्षण आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी त्यांनी पश्चीम बंगालमध्ये जेंव्हा डाव्यांचे राज्य होते त्यावेळी ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांची कशा प्रकारे हत्या झाली होती याची अठवणही करुन देत जी व्यक्ती अशा प्रकारच्या क्रूरपणाला सामोरी गेली आहे त्या व्यक्ती कडूनच अशा प्रकारचे कृत्य अनपेक्षीत आहे असेही त्या म्हणाल्या.